रविवार, १४ जुलै, २०१३

भारतीय समाजघटक अवगुण निरूपण


ऐका ऐका हो बुध जन | भारतीय समाज लक्षण | अवगुणांचे निरूपण | आरंभियेले ||
लाक्षणिक समाज घटक | अवलोकोनि येक येक | लक्षणे वार्णिली प्रत्येक | श्रवणी घ्यावी ||
उल्लेखिल्या प्रकारात | अपवाद नेहेमी असतात | त्यामुळे देशाचे संयंत्र | चालू असे ||
आणखी येक विनंती | त्रयस्थे वार्णितो अल्पमती | मी ही येथ संप्रति | निराळा नसे ||


घटक १: अतिसामान्य जन
आम्हां कामाचा कंटाळा | सरकारी पैशावरी डोळा | अनुदान मागी सर्वकाळा | दुर्मुखाने ||
जरी पिचलेली परिस्थिति | मोबाइल असावा खिशाप्रती | आणि डिश पत्र्यावरती | रोवली असे ||

घटक २: सामान्य जन
आम्हां दैवाने देवविले | पोट जाळण्यापुरते भले | त्यामुळे अलिप्त जाले | विश्व आमुचे ||
आम्ही कूपमंडूक | दिवाभीताचा पिंडक | असुरक्षेचा धाक | मनी बैसला ||

घटक ३: इतरेजन:
आम्हां कशाशी न घेणे-देणे | सदैव चकाट्या पिटणे | इकडून तिकडे फिरणे | बिनाकामाचे ||
लोकोपयोगी साधने | आमच्या बापाची आंदणे | हागणे, मुतणे, थुंकणे | तेथेची असे ||

घटक ४: पक्ष कार्यकर्ता
दिवसा आंदोलने भरीली | फुकाची भाकरी तोडिली | रात्री नवटाक मारीली | दिडकीची ||
नेत्याचा घोष घुमविला | प्रसंगी मारही खाल्ला | परि खिसा फाटका उरला | महिनाखेर ||

घटक ५: किरकोळ नेता
सदा पांढरे नेसावे | सलून मध्ये डोकवावे | टोळभैरवा संगे हिंडावे | फुशारकीने ||
थोरांच्या तसबिरी लावाव्या | टिळे, दाढया वाढवाव्या | आचरणी मात्र नसाव्या | आदर्श बाबी ||

घटक ६: राज्यकर्ते
कित्येक तपे राज्य केले | बसोनी शष्प उत्पाटिले | आणिक ढोल बडविले | नितंबाचे ||
अमाप पैसा ओढला | जनसामान्य नाडिला | विरोधकास धाडीला | यमसदने ||

घटक ७: मीडिया
नेता कोपर्‍यात पादला | ढामाढूम अथवा फुसकुला | यांनी परिमळ पसरविला | सर्व देशे ||
नेत्यांनी कुल्ले दीपवावे | यांनी प्रकाशित करावे | लांगूलचालन आचरावे | सर्वकाळ ||

घटक ८: विचारवंत
विचारवंताचे सगळे | सर्वांहुनी निराळे | यांस असती तीन डोळे | आणि बारा “अवयव” ||
मतांच्या पिंका टाकाव्या | प्रश्नखेळी गाजावाव्या | कमरेच्या लुंग्या बांधाव्या | टाळक्यासी ||

घटक ९: व्यापारी
यांचे सगळे क्षेम चाले | खोबरे तिकडे चांगभले | वार्‍यानुसार फिरविले | तोंड आपुले ||
यांना न देशाची फिकीर | नको नसती उस्तवार | हाती धरून लाचखोर | कार्यभाग साधावा ||
 

ऐशी वार्णिली लक्षणे | आणि नोंदविली निरीक्षणे | यात भर घालणे | आपल्या हाती ||

........................................................................................................अभिनव

बुधवार, २२ मे, २०१३

प्रश्न.........प्रश्न.........प्रश्न

बाबा, माणसं कशी येतात रे ? निरागस डोळे कुतुहलाने मोठे करून माझा मुलगा मला प्रश्न विचारात होता. हल्ली त्याचं प्रश्न विचारणं फार वाढलंय. मी ही त्याचं कुतूहल थोपवत नाही. पूल कसा बनतो ? भू-भू जीभ बाहेर काढून का बसतं ? गाढवाच्या नाकातून काय लोंबत असतं ? घरात येणारी धूळ कॉटखाली का जाऊन बसते ? वाघोबा पिंजर्‍यात का असतो, भू-भू सारखा रस्त्यावर का नसतो? शी केल्यावर घाणेरडा वास का येतो ?.............असे असंख्य प्रश्न ! बाकी प्रश्नांची त्याला कळतील अशी उत्तरं मी देऊ शकलो पण आजचा प्रश्न निराळा होता.
 
माणसं कशी येतात ??????? मी त्याला, येतात म्हणजे कुठे येतात  असा प्रतिप्रश्न केला आणि बसमधून येतात, चालत येतात अशी काही दुर्बल उत्तरे दिली  जेणेकरून त्याची दिशा भरकटून तो इतर विषयांकडे वळावा. पण तो बधला नाही. "पण माणसं जगात येतात कुठून ?" त्याने प्रश्न आणखी स्पेसिफिक केला.  मी गांगरलो. पण त्याचा हा प्रश्न अर्धाच होता "म्हणजे ती सगळी माणसे त्यांच्या आईच्या पोटात कुठून येतात ?"  (ब्रूटल अटॅक)..........च्यायला पंचाईत आली.... मी आठवणींचे जुने संदर्भ चाळू लागलो.
 
 
पाचवी-सहावीत असताना मीही हा प्रश्न "मुलं लग्नानंतरच का होतात ?" असा विचारला होता आणि त्याचं उत्तर -- 'मोठा झालास की कळेल आपोआप !!!!' असं मिळालं होतं. पुढे ते खरंही ठरलं होतं.  शालेय जीवशास्त्र हे फारच मोघम होतं. आमच्या म्हातार्‍या सरांनी तर तो धडा शिकवलाच नव्हता कारण त्याला मार्कही जास्त असणार नव्हते. स्वत: वाचून अभ्यास करता करता "किडनी"ला आम्ही भलतंच काहीतरी समजून बसलो होतो. शिवाय  जीवशास्त्रात अवयवांची साधीसाधी नावं  न वापरता अवघड अशी संस्कृत नावं वापरली होती आणि गोंधळ अधिकच वाढवला होता. परिणामी "मुलं कशी होतात?"  याचं मला मिळालेलं उत्तर खरं असलं तरी त्याचे सोर्सेस हे सवंग / अश्लील म्हणावेत असेच होते.  
 
मिसरूड फुटण्याच्या वयात एका मित्राला मुलं कशी होतात याचं खरं कारण मी सांगितलं होतं. तो बिचारा या माझ्या सांगण्याला क्षीण विरोध करत होता. "आमच्या घरी तरी असं काही झालं नसावं"...वगैरे वगैरे !  माय-बापाबद्दलचा आदर त्याला निसर्ग-नियम नाकारायला लावत होता. त्याच्या माय-बापाची त्याच्या मनातली प्रतिमा धुरकटलेली मला त्याच्या डोळ्यांत स्पष्ट दिसत होती. अर्थात, हे सगळं मला आज विचार केल्यावर उमगलं, तेव्हा काही समजच नव्हती म्हणा.
 
 
मी जरा जास्तच विचार करत होतो बहुतेक, कारण एव्हाना माझा लेक पेंगुळला होता. त्याच्या डोक्यावर तेल थापून मी त्याला नीट  झोपवला. पण मला झोप लागेना.  पूर्वापार बहुधा सर्व, आया आज्ज्या मुलीबाळींना स्त्रीधर्माचं ज्ञान देतात मग बापये लोक हेच काम आपल्या मुलांसाठी का करू शकत नाहीत ? मुलांना हे ज्ञान बहुतांशी काळ्या पडद्या आडून किंवा एस्टी स्टँडवर मिळणार्‍या  रंगीबेरंगी पुस्तकातूनच का मिळावं ? आता तर इंटरनेटवर असलं वाङ्मय भरपूर आणि सहज उपलब्ध आहे. या माध्यमांत गैरसमजुती, अपप्रवृत्ती वाढतील याकडेच जास्त भर दिलेला आहे. आशा परिस्थितीत बाप म्हणून माझी ही जबाबदारी मला कधीतरी पार पाडावीच लागेल. माझा मुलगा आज लहान आहे, एखादं मांजर, कुत्रं दाखवून मी त्याचं लक्ष सहज वळवू शकतो परंतु पुढे पुढे घरी न मिळणारी उत्तरं तो बाहेर शोधेलच. मग जसं "बाहेरचं खाऊ नको आपण घरी करूया" असं आपण सांगतो तसं हे अत्यावश्यक ज्ञान अत्यंत शुद्ध आणि सुसंस्कृत स्वरुपात घरीच दिलेलं बरं नाही का ?  
 
 

रविवार, २८ एप्रिल, २०१३

तो आणि ती


तो आणि ती एका वर्गात नव्हते की एका शाळा किंवा कॉलेजात नव्हते, शेजारी शेजारी रहात नव्हते, दोघांच्या कुटुंबांची साधी ओळखही नव्हती. तो गरीब पण सुसंस्कृत कुटुंबातला, आणि ती क्रीमी लेयर मधली. तो गल्लीत विट्टी-दांडू खेळणारा तर ती स्टेडियमवर जिम्नेस्टिक शिकणारी. हा मोकळ्या वेळेत घरची कामं करायचा, ती फावला वेळ गायन शिकायची. हा दोन रुपयाचं तिकीट काढून सरकारी स्पर्धेतली संगीत नाटकं बघायचा आणि ती थेटरातल्या बॉक्समध्ये सहकुटुंब कौटुंबिक सिनेमे बघायची. दोन अगदी वेगवेगळ्या वर्तुळात जगणारे जीव होते. दोघांची गाठ पडेल अशी काहीच परिस्थिति नव्हती. तरी त्यांची भेट झाली.

तो आणि त्याचा मित्र रोज कॉलेजला चालत जायचे तिच्या घरासमोरच्या रस्त्यावरून. पण हे काही भेटीचं कारण नव्हे, रस्त्यालगत कित्येक घरे असतात त्यातल्या कित्येक घरात मुली असतात आणि कित्येक मुलं अशा रस्त्यांवरून जात-येत असतात. असो. जानेवारीतल्या एका सकाळी तो मित्रासमवेत कॉलेजात जात होता. ऊसाच्या गाड्यांची रहदारी सुरू होती. त्याने आणि त्याच्या मित्राने उड्या मारून चार ऊसाची कांडकी तोडली आणि खात खात पुढे निघाले. हे नेमकं तिच्या आईनं पाहिलं. दुसरे दिवशी त्या बाईनं त्याला हाक मारून ऊस मागितला संक्रांतीला मडक्यात घालायला ! आणि तो घ्यायला मुलीला (म्हणजे तिला) पाठवलं. बास्स ! हेच कारण आणि एव्हढीच भेट. तो काही “फ्लर्ट” नव्हता शिवाय इतर भानगडीत पडणं त्याला परवडणार नव्हतं त्यामुळं त्याच्यासाठी हा प्रसंग संपला होता (?).

संक्रांतीच्या दुसरे दिवशी, त्याच वेळी तिच्या घरातून हाक आली. ऊसाची परतफेड म्हणून तिळाच्या वड्या त्याला लाभल्या. मग माफक ओळख आणि चौकशी झाली. पुढच्या दिवशी चालताना सहज त्यानं तिच्या बाल्कनी कडे पाहिलं. ती होतीच. ती हसली, ह्यानंही स्माईल रिटर्न केलं. पुढे असंच त्याचं रुटीन चालू राहिलं आणि दोघांची चांगली मैत्री जमली. ते दोघे एकत्र नदीकाठी बागेत बसायचे, फिरायचे, गप्पा मारायचे पण उघड-उघड प्रेमाची बोलणी छेडली गेली नव्हती. (इथे याच्या किंवा तिच्या घराचे कोठेही खिज-गणतीत नाहीत. कारण त्यांच्याकडून कोणतीही आडकाठी, त्रास, जाच, नकार काहीही नाही म्हणूनच त्यांचं इथे काही काम नाही). तो आला की तिला बरं वाटायचं, तो बोलला की ती आनंदून जायची. ती एखादे नाट्यगीत गुणगुणली की त्याला कोण कौतुक वाटायचं. खरं तर दोघं प्रेमात होते असं म्हणायला काहीच हरकत नव्हती; मात्र “माझं तुझ्यावर प्रेम आहे” हे शब्दांनी बोलायची गरज खरंच उरली नव्हती. त्या दोघांचं एकमेकांबरोबर असणंच दोघांनाही सुखावह होतं.

पण त्याला आतल्यात एक गोष्ट फार खटकायची. ती कधीही त्याच्या शब्दाला नकार द्यायची नाही. तो कॉलेजच्या सहलीला जाणार होता तेव्हा सहज गमतीनं त्यानं तिला “बस-स्टँडवर येशील ?” असं विचारलं होतं तर ती रात्री 10.00 वाजता त्याला भेटायला आली होती. एकीकडे “ती बालिश आहे” असं त्याची बुद्धी म्हणायची तर “ती तुझ्यावर पूर्ण विश्वासून आहे” असं त्याचं मन म्हणायचं. तो बुद्धी-प्रामाण्यवादी होता म्हणून त्याला बुद्धिचाच कौल पटायचा. पुढे शिक्षणं संपली. तो नोकरीला लागला, ती ही पार्ट टाइम काम करू लागली. मोबाइल तेव्हा नव्हते त्यामुळे प्रत्यक्ष भेटण्याची ओढ दोघांनाही असायची. पण तो हल्ली तुटक तुटक राहायचा. तिच्याशी थोडं अंतर ठेऊन वागायचा. तिचं त्याच्याशी बिनधास्त वागणं त्याला खटकायचं. त्याच्या बुद्धीवर झालेले संस्कार त्याला डिवचत. काही वेळा “ते” धुंद जवळीकीचे क्षणही आले होते, पण त्यानं कटाक्षानं बुद्धी जागी ठेऊन अंतर राखलं होतं. तिचं असणंच जरी त्याच्यासाठी होतं तरी त्याला मात्र तिचं स्वतंत्र आणि पोक्त अस्तित्व अपेक्षित होतं.

तिच्या लग्नाचे विषय निघायला लागले तेव्हा तिनं त्याला सांगितलं आणि विचारलं “केव्हा आपण आपापल्या घरी सांगणार ? निर्णय घ्यायचा का ?” या प्रश्नावर तो अडखळला. तिला म्हणाला “मला अजून निर्णय घ्यायचा धीर होत नाही. तुझ्याशिवाय मी कुणाचाही विचार केला नाही हे खरं पण तू अजून बालिश आहेस, तू स्वत:चा विचार आणि बुद्धी वापरायला कधी शिकणार? मी सांगतो ती पूर्व मानून चालतेस, इतका अंध-विश्वास बरा नव्हे. माझ्या सहचारिणीच्या व्याखेत तू बसत नाहीस. आपले मार्ग यापुढे वेगळेच असलेले बरे.” यावर तिनं वाद घातला नाही. तो विमनस्क आणि ती अश्रु ढाळत कृष्णेकाठी बसून राहिले. सांज झाली दोघे आपापल्या दिशेने पांगले ते कायमचेच. “समेत्यच व्यपेयाताम तद्वत भूतसमागम:” हे ही संस्कार त्याच्या बुद्धीवर झाले होते त्यामुळे त्याचं जगणं पूर्ववत सुरू व्हायला वेळ लागला नाही. त्याचं मन रडत होतं पण बुद्धी अटळ होती.

मनातली सल सहन होईना म्हणून काही वर्षानी त्यानं अत्यंत विश्वासातल्या शालूताईला ही गोष्ट सांगितली. तेव्हा शालूताई त्याला म्हणाली “वेड्या, तारुण्यात चुका होतात, त्या निस्तरण्याची, निभावून नेण्याची कुवत आहे की नाही हे तपासण्यापुरताच बुद्धीचा उपयोग करायचा असतो. तिचं बालिश असणं तिच्या वयानुरूपच होतं. तूच अकाली पोक्त झालास. भावना थेट मनात पोहोचू द्यायच्या असतात. त्या अशा बुद्धीच्या गाळण्यातून गाळायच्या नसतात. तिचं समर्पण तुला कधी दिसलंच नाही.. तू संस्कारांचं अवडंबर करून बसलास आणि तारुण्याच्या कोमल, भावुक प्रवाहांना आणि त्याचबरोबर एका फक्त तुझ्याचसाठी जगणार्‍या जोडीदारालाही मुकलास.

खोच भळभळून निघाल्यानं त्याला आज वेगळाच मोकळेपणा वाटला होता मात्र “तिला काय वाटलं असेल ? कुठं गेली असेल ती ? ती सुखी असेल का ?” या नवीनच प्रश्नांचं ओझं डोईजड झालं होतं. आयुष्यात पहिल्यांदा त्यानं स्वत:साठी पेग भरला. दारूचे दुष्परिणाम त्याच्या बुद्धीला माहीत होते पण आज त्यानं मनाचा कौल मानला होता.

 

सुशिला


सुशी म्हणजे सुशीला, डॉक्टरांच्या घरी धुणी-भांडी करायची. डॉक्टरिणबाई अंमळ आळशी असल्याने बिच्चारी सुशी दिवसभर राबायची. कपडे दृष्ट लागण्याइतके स्वच्छ करायची. राखेत जरासा निरमा टाकून लख्ख भांडी घासायची. छान पोळ्या करायची. डॉक्टरिणबाईंना नेहेमी पाणी स्वच्छ लागायचं, म्हणून मग त्या रोज चार हांडे पाणी शेंदून घ्यायच्या सुशीकडून ! कालचं पाणी ओतायचं आणि आज पुन्हा नवीन भरायचं. इन-मीन तीन माणसं घरात; तरी दिवसभर राबूनसुद्धा सुशीचं काम संपायचं नाही.

 

सुशी डोक्यानं जराशी हुकलेली होती. याचा फायदा घेऊन डॉक्टरिणबाई तिला कमी पैशात राबवून घ्यायच्या. संध्याकाळी तिची आई शालन तिला घरी न्यायला आली की त्या काहीतरी खोट्यानाट्या तक्रारी सांगायच्या. क्वचित प्रसंगी काहीतरी तोडलं-फोडलं असला कांगावा करून पैसे वळते करून घ्यायच्या. डॉक्टरसाहेब आणि त्यांचा मुलगा दोघेही सर्जन. स्वत:चे हॉस्पिटल असल्यामुळे दोघेही रात्र पडेतो घरी यायचे नाहीत. घरी डॉक्टरिणबाइंचा एकछत्री अंमल होता.

शालनताईही डॉक्टरांच्या हास्पिटलात झाडू-फारशी करायच्या. रोज थकून परत यायच्या, वर ही रोजची कटकट ! राग सुशीवरच निघायचा. पण आरड्या-ओरड्याचा सुशीवर काहीही परिणाम होत नसे. ती आपल्याच तंद्रीत शून्यात बघून हसत राहत असे. कधी कधी सुशी मारही खायची. रात्री तिला जवळ घेऊन तेल लावताना तिच्या पाठीवरचे वळ बघून शालनताई हमसून रडायच्या! पण गप्प राहण्यापलीकडे त्या काही करू शकत नव्हत्या. दोन वेळचं खाणं आणि वर थोडाफार पगार मिळतो; शिवाय भोळसट लेक एकटी घरी राहायला नको म्हणून शालनताई तिला डॉक्टरांच्या घरी पाठवायच्या.

 

सुशी भरल्या बांध्याची होती. चेहेर्‍यावरचा शून्य भाव सोडता दिसायलाही नेटकी होती. स्त्री-धर्माचं पालन करण्याइतपत तिला कळायचं पण बाकी जगाचा, पैशाचा व्यवहार तिला समजायचा नाही. चांगल्या-वाईटाचं भान कमीच होतं. शालनताईंचं बारीक लक्ष नसतं तर कुणीही तिला भुलवू शकलं असतं. शालनताईंनी तिला जगापासून झाकून ठेवली होती. पण वय किती लपून राहणार ? टवाळ कार्टी, गल्लीतले गुंडपुंड सुशी ला सतावू लागले, कालक्रमाने शालनताईंचा धाकही त्यांना वाटेना. रात्री अपरात्री दार वाजवण्यापर्यंत मजल गेली. फार काय म्हातार्‍यांच्या नजराही सुशी ला घेरू लागल्या. शालनताई हतबल होत चालल्या. शेजारचे लोक मदतीला येत नव्हतेच पण टोचायची संधीही सोडत नसत. आजूबाजूच्या संभावित गृहिणी नाही नाही तसले बोल लावून, सल्ले देऊन या मायलेकींना अगदी जगणं मुश्किल करत होत्या. एके दिवशी अचानकपणे सुशी आणि शालनताई कामावर यायच्या बंद झाल्या. डॉक्टरसाहेबांनी चौकशी केली तेव्हा कळलं की कुण्या नरपुंगवाने संधी साधली. निसर्गाने नियम पाळला आणि सुशी गर्भार राहिली. शालनताईंना हे सगळं असहय झालं आणि सुशी ला एकटीला टाकून त्या जग सोडून गेल्या.

 

अनपेक्षितपणे डॉक्टरिणबाईंचा चांगुलपणा उफाळून आला आणि त्यांनी स्वत: लक्ष घातलं. जास्त वेळ न दवडता प्रथम सुशी ला "ट्रीटमेंट" केली. शालनताईंचं किडूक मिडूक विकून त्या बदल्यात डॉक्टरिणबाईंनी सुशी ला कायमचं त्यांच्या घरीच ठेऊन घेतलं. डॉक्टरिणबाईंच्या डोक्यावर कनवाळूपणाचे, दयाळूपणाचे शिरपेच भूछत्रासारखे उगवून आले. शिवाय त्यांना या व्यवहारामुळे फुकटात निमूट राबणारी, राग काढायला हक्काचं ठिकाण असणारी आणि समाजात स्वत:चा मोठेपणा मिरवायचं साधन असलेली गुलाम तहहयात मिळाली होती.

 

डॉक्टरसाहेबांच्या बागेत गेलेला चेंडू आणायला गेल्यावर आम्हाला हाकलणारी सुशी आम्हाला दुष्ट वाटायची पण आता तिची कीव यायला लागली. झाल्या व्यवहारातला फायदा-तोटा काढायची अक्कल सुशी ला नव्हतीच ! तिला गुंडाळलेलं घोंगडं टोचणारं असलं तरीही तिची लाज राखत होतं ही त्यातल्यात्यात जमेची बाजू. डॉक्टरसाहेबांच्या जवळपासच्या लोकांना खरं काय आहे याची कल्पना होती. पण कुणीही उघड बोलू शकत नव्हते. पांढरपेशा संस्कारांनी दिलेली रूप बदलण्याची जादू आमच्यासह सगळ्या लोकांनी सोयीने करवून घेतली होती. आम्ही सगळे निव्वळ पांढरपेशी माकडं बनलो होतो.................................... वाईट न बोलणारी, वाईट न ऐकणारी आणि वाईट न बघणारी !

 

 

प्रेम-प्रकरण


इयत्ता आठवी ते कॉलेजची पहिली 2 वर्षे हा काळ सोनेरी असतो म्हणतात. तारुण्यात प्रवेश होण्याचा तो काळ असतो म्हणून असेल कदाचित. अचानक आपण कोणीतरी स्पेशल आहोत असं वाटायला लागतं; मुला-मुलींना एकमेकांशी वागण्या बोलण्यात एक प्रकारची भीड जाणवू लागते; अधिकाधिक स्मार्ट दिसण्यासाठी प्रयत्न केले जातात. दंगेखोरपणा थोडासा कमी होतो. शिक्षकांनी वर्गात ओरडल्यावर किंवा शिक्षा केल्यावर अपमान झाल्याची भावना येते, त्यात एखादा समदु:खी सापडल्यावर बरं वाटतं. अशा वेळेस आपला सख्खा मित्रही समदु:खी नसेल तर शत्रू वाटून जातो कारण तोही आपल्याला हसत असतो. सामुदायिक कार्यक्रमात जास्तीत जास्त सहभाग करण्यासाठी प्रयत्न केले जातात. शर्टाची इस्त्री बिघडू नये याकडे लक्ष दिले जाते. थोडक्यात काय तर वेगळेपण भासवण्याकरिता आणि इंप्रेशन मारण्याकरिता प्रयत्न असतात.

माझी या वयाची सुरुवात तर अशीच झाली पण पुढं या कशातही रस वाटेना. आम्हा तीन मित्रांचं टोळकं होतं. अभ्यासाची गोडी होती असं नव्हे पण आम्ही बर्‍यापैकी नंबरात असायचो. त्यात अख्ख्या शाळेत संस्कृतमधे पैकीच्या पैकी मार्क मिळवणारे आम्हीच होतो. आवाजाही बरा होता त्यामुळे इच्छा असो वा नसो भावे सर आम्हाला स्नेहसंमेलनाच्या गाण्यासाठी खेचत असत. भावे सरांनी, किंवा त्यांच्या बरोबरच्या बर्‍याच मास्तरांनी आमच्या काका-आत्या यांना शिकवलं होतं. आमची सगळी फ्यामिली (हिस्टरीसह) या गुरुजनांना माहितीतली होती. त्यामुळेच की काय आमचा वावर गुरुजनांमध्येही सहज असायचा. खेळ खेळण्यात किंवा वर्ग-प्रतिनिधी व्हायला आम्ही कधीच तयार नव्हतो. तरीही आम्हाला बर्‍यापैकी भाव मिळायचा. आम्ही मात्र नदीवर पोहणे, वटवाघूळ, कासवे पकडणे, सुगरणीची घरटी काढणे, असल्या  “उद्योगातच” रमायचो. शाळेतली हजेरी ही फक्त शिकणे आणि परीक्षा यापुरती मर्यादित राहिली होती.

पुढे आमच्या त्रिकुटातल्या गणेश पूर्णपात्रे उर्फ गप्पूला “पोरगी पटवणे” या रोगाचा संसर्ग झाला. एक मुलगी त्याला अचानक आवडू लागली. पण या विषयात आम्हा दोघांना काहीच गती नसल्याने आमचे मत किंवा सल्ला हा त्याच्यासाठी बाळबोध असायचा. हळू-हळू आमचा हा मित्र दुरावत गेला. खर्‍या अर्थानं त्याचं लफडंप्रकरण” झालं. (माझा कोणी एक थोरला चुलतभाऊ बँकेत प्रकरण केलंय म्हणून आबांना सांगत होता तेव्हा त्यानं बंकेतल्या कुठल्याशा बाईबरोबर सूत जुळवलं असावं असं मला वाटलं होतं आणि आबा त्याला रागावण्याऐवजी कुतुहलाने का ऐकत आहेत हे कळलं नव्हतं)  शाळेत ऐकिवात असणार्‍या अनेक लफड्यांमधे आणखी एकाची भर झाली. तिच्या घराभोवती सायकलने चकरा मारणे, उगीच पुस्तके-वह्या मागणे, ती ज्या क्लासला जाते तिथे चौकशीला जाणे असल्या लीला करण्यात गप्पूची एक-दोन शालेय वर्षे सरली. दहावीच्या निकालावर अपेक्षित परिणाम झाला. पुढे “ती” सायन्सला गेली. आणि गप्पू अर्थातच कॉमर्सला ! सागर बाहेरगावी गेला आणि मी गरजेपोटी डिप्लोमा पत्करला. एकंदरीत गप्पू वाया जाण्याच्या तयारीला लागला होता. अधे-मधे गप्पू मला संघाच्या सायं-शाखेत भेटायचा पण “संख्येला” त्याची मोजणी नसायची.

गप्पूचं लफडं इतिहासजमा झालं असेल अशी माझी समजूत होती पण तसं मुळीच नव्हतं. एके दिवशी मी कॉलेजमधून परतात असताना एकजण मला सामोरा आला. समोर आल्या-आल्या त्याने मला एक मजबूत थोबाडीत हाणली. माझ्या डोळ्यासमोर काजवे चमकले. त्याच्या बोलण्यावरून तो तिच्या कॉलेजमधला एक “उमेदवार” होता हे समजलं आणि त्याला कुणीतरी हिअर-से एव्हिडन्स दिलाय याचा अंदाज आला. त्यानं “तिच्याकडं बगितलास तरी डोळे काढीन” असली दमदाटी मलाच सुरू केली. विनाकारण माझाच हनुमान झाला होता ! मी तर “तिला” शोधायलाही गेलो नव्हतो तरी माझी शेपूट पेटली होती. च्यायला ! गप्पूचं लफडं मला भोवलं होतं. पुढच्या सेकंदाला आणखी एक थप्पड माझ्या कानशिलात बसली आणि माझ्या आबांनी मला दिलेले व्यायामाचे धडे पहिल्यांदा आठवले.  आमची भर रस्त्यात हाणामारी सुरू झाली. सदर खलनायक हा सिगरेट फुकून खंगलेला असावा, कारण माझ्यासारख्या अतिसामान्य बांध्याच्या बैलाने, खेचराने म्हणा हवंतर, एका उद्दाम माजोरड्या वळूची खांदेमळणी (?) एकदोन राम-टोल्यात भागवणे हे अजब होतं (अस्मादिकांच्या व्यायामाची पोच ही आरोग्य उत्तम राखण्यापर्यंतच होती; त्यात पैलवानकीचा मागमूसही नव्हता). त्याला लाथा घालत असताना सुरवातीचे बघे पब्लिक मधे पडले आणि त्यांनी कुस्ती निकालात काढली. 

पण खरी गम्मत पुढेच होती. हा वळू मला “बघून घेतो थांब, उद्याच येतो, तुला उभा चिरतो” .........वगैरे वगैरे धमकावून निघून गेला. दुसरे दिवशी कॉलेजच्या दारात हा बैलोबा त्याच्यासारख्याच 10-12 पोरा-टोरांचं टोळकं घेऊन आला. मी खरं तर आतून घाबरलो होतो पण त्यांना सामोरा गेलो. मला थांबवायला सायकल आडवी घालून या टोळक्याचा म्होरक्या त्या वळू समवेत पुढे आला. त्याला बघून मला चांगलाच चेव चढला (खरं तर जीव भांड्यात पडला !) कारण हे महाशय दुसरे तिसरे कोणी नसून दस्तुरखुद्द गप्पू-दादा होते आणि म्हणून आता परिस्थिति झटक्यात माझ्या अधिकरणाखाली आली होती (आफ्टर-ऑल आय वॉज वन ऑफ हिज बेस्ट फ्रेंडस !). गप्पूच्या टारगट मित्र-मंडळामधे असणारी भली थोरली कम्युनिकेशन गॅप (हा शब्द मी इंजींनीयरिंगच्या पहिल्या वर्षी शिकलो आणि त्याचा प्रत्यय लगेचच आला) आणि पराकोटीचा गलथानपणा (हा शब्द मात्र मी लग्नानंतरच ऐकला; याचा प्रत्यय माझ्याबाबतच माझ्या कलत्राला येतो म्हणे !) यांचा परिपाक म्हणजे उद्भवलेला प्रसंग होता. आता चढी बाजू मिळाल्यावर त्याचा फायदा घेत या प्रसंगी मी गप्पूला खास कृष्णा-काठच्या शिव्यांचा आहेर केला. कालचा व्हिलन आणि बाकी पोरं खाली मान घालून उभी होती. “दादा”च्या “टप्प्याच्या” मागे लागणे आणि चुकीच्या समजुतीने दादा”च्या सख्ख्या मित्राला (म्हणजे मला) हाणामारी केल्याच्या गुन्ह्याबद्दल व्हिलनला माझ्यासमोर स्वत:च्या थोबाडीत मारून घेण्याची शिक्षा सुनावली आणि लगोलग ती पूर्णही झाली, गप्पूने सारवासारव केली आणि ते सर्व निघून गेले.

हा सगळा प्रकार भेदरून बघणार्‍या आमच्या कॉलेजच्या मुला-मुलींना या प्रकरणाची पार्श्वभूमी माहीत नव्हती. त्यामुळे माझ्या “धीरोदात्तपणाच्या” (?) कथा (सदर घडलेली आणि इतर न घडलेल्या) सगळ्या कॉलेजमध्ये पसरल्या. या बद्दल गुरुजनवर्ग व प्राचार्य यांचेकडून माझे कोड-कौतुक करण्यात आले. पण त्याही पेक्षा महत्वाचे म्हणजे .............. वर्गातील मुली काही कारण नसताना माझ्या नोट्स मागू लागल्या, माझ्याशी प्रोजेक्ट वगैरेच्या निमित्ताने बोलाचाली वाढवू लागल्या,  परिणामी मी गप्पूच्या खात्यात भरलेल्या सांगली स्पेशल शिव्या हळू हळू डेबिट टाकू लागलो.

 

दारिद्र्य


ही घटना असेल साधारण १९८९ सालची. मी माध्यमिक शाळेत गेलो होतो. आर्थिक परिस्थिति अगदी बेताची होती. आबांच्या तोकड्या पेन्शनवर घर चालत असे. घरखर्चाला हातभार लावायला माझी आज्जी गोडा मसाला, हळद, तिखट वगैरे तयार करायची आणि ओळखीच्या लोकांना विकायची. कधी कधी कुणाकडे मोदक, पुरणपोळी किंवा केशरी शिरा असले स्पेशल पदार्थ करून द्यायची. आमच्या घरापासून थोड्या अंतरावर न्यायाधीशांच्या क्वार्टर्स होत्या. आमच्याकडे आज्जीला मदतीला येणार्‍या बाई या तिकडेही काम करत असल्याने तिकडच्याही काही ऑर्डर्स आज्जीला मिळायच्या. मी सायकल चालवायला शिकलो होतो जवळच्या दुकानात सायकल तासाला चार आणे (25 पैसे) पैसे दराने भाड्याने मिळायची. मी तेथून सायकल घेऊन भाजी आणणे, दळप आणणे, म्हदबाच्या दुकानातून किराणा आणणे, रद्दी विकून येणे, ऑर्डरचे पदार्थ पोचवणे असली कामे करायचो, शिवाय आज्जीने मला स्वयंपाकाच्या संदर्भातली साईडची कामे शिकवली होती (उदा. मसाला चाळणे, पुड्या बांधणे, पितळी सोर्‍याने चकल्या पाडणे, करंज्या कातून देणे, नारळीभाताच्या किंवा प्रसादाच्या शिरयाच्या मुदी करणे, लाडू वळणे इ.इ.) मी आज्जीला बर्‍यापैकी मदत करायचो.

एकदा एका न्यायाधीशांच्या कडे काहीतरी कार्यक्रम होता. आज्जीला नारळीभाताची ऑर्डर होती शिवाय त्यांच्याकडे जाऊन मुदी पाडून द्यायच्या होत्या. मी मोठ्ठा डबा घेऊन दुपारचा तिकडे गेलो. त्यांच्याकडे पाहुणे येत होते नि जात होते. वाढताना भात गरम असावा म्हणून लोक येतील तसे मुदी पडाव्या लागत होत्या. मला सपाटून भूक लागली होती पण काम संपेना. शेवटी रात्री ९ वाजता वर्दळ कमी झाली. आणि सदरहू गृहिणीने मला घरी जायला सांगितले. मला भूक आवरेना मी त्यांना थोडे खायला मागितले आणि नारळीभाताचे पैसे मागितले (सामान म्हदबाकडून उधारीवर आणले असल्याने आज्जीने पैसे घेऊनच ये असे बजावले होते). त्यावरून त्या एव्हढ्या संतापल्या आणि नाही नाही ते बोलल्या (त्यांच्या बोलण्यानुसार मी भिकारडा होतो). मला राग आला आणि रडू यायला लागले. पोटातल्या भुकेसाठी फक्त आवंढे गिळून मी घरी आलो. माझ्यासमोर अख्खा स्वयंपाक असतांनाही मी कशालाही हात लावला नव्हता. आज्जीला सगळा प्रकार सांगितला आणि हमसून हमसून रडू लागलो. आज्जी म्हणाली "तू फक्त पैसे मागायला हवे होतेस, आपल्या हक्काची नसलेली कुठलीही वस्तु मागणारा ...................." पुढं तिला बोलवेना. ती ही पुढचे शब्द गिळून गप्प बसली आणि नंतर २ दिवस माझ्याशी बोलली नाही. मला खरंच त्यावेळी आज्जीचं अर्धवट वाक्य आणि त्या नंतरचा अबोला दोन्ही कळलं नाही. परंतु ही घटना माझ्या मनावर जबर आघात करून गेली. आजही नारळीभात बघितला की त्या वेळेस आज्जीच्या मनाला माझ्याकडून नकळत दिल्या गेलेल्या वेदना आठवतात आणि नारळीभात माझ्या घशाखाली उतरत नाही. पण त्या दिवशी रागानेच का होईना; परमेश्वराव्यतिरिक्त कुणाकडेही कशासाठीहि कधीही हात पसरणार नाही हा चंग बांधला आणि नेहेमीच त्यावर ठाम राहिलो.

दारिद्रयाची खाण उपासताना खरी सुखं सापडली ती गरम पोळ्यांत-मुगाच्या खिचडीत, नदीत डुंबण्यात, आणि हलकीशीसुद्धा जाग न येता पहाटे गजर होईतोपर्यंत आराम झोपण्यात. स्वत: लख्ख धुतलेला सदरा दुसरे दिवशी मूर्तीमंत स्वाभिमान होऊन अंगावर बसायचा. उसवलेली चड्डी स्वत: शिवली तेव्हाच स्वत:चा आब राखायची हिम्मत आली.  शिकायची खरी इच्छा असेल तर.............. दारिद्र्यासारखी उत्तम शिक्षण देणारी शाळा दुसरी कुठलीही नाही. या शाळेनं बरंच काही शिकवलं. उत्तम भुकेसाठी आणि पुढ्यात येईल ते खाऊन पचवण्यासाठी रोज व्यायाम करणं शिकवलं; रात्री अर्धपोटी किंवा उपाशी झोपणं तब्येतीला चांगलं असतं हे शिकवलं ( डाएटीशियन नावाचे डॉक्टर हे ऐकवायचे हजारेक रुपये घेतात !); जमिनीवर सतरंजी घालून झोपलं की पाठदुखी होत नाही हे शिकवलं; थंड पाण्याची आंघोळ बारमाही करणार्‍याला ऊन, पाऊस, थंडी कमीतकमी बाधते हे शिकवलं; आणि भरपूर कष्ट केले की भुकेच्या वेळा साजर्‍या करायला शिरा-पुरी किंवा शिळी पोळी समानच असतात हे ही शिकवलं. ही शाळा आपल्याला घासून पुसून लख्ख करते; फालतू गर्वाचा कृत्रिम मुलामा झटकते आणि स्वाभिमानाची झळाळी देऊन जाते.

 

 

इंदौर


“टिक क्लिक .......लेडीज अँड जेंटलमन, वुई आर शॉर्टली लॅंडींग अॅट देवी अहिल्याबाय होलकर इंटरनॅशनल एयरपोर्ट इंदौर, द डे इज स्लाइटली विंडी आऊट साईड विथ टेंपरेचर अॅज लो अॅज एलेव्हन डिग्री सेंटीग्रेड. हॅव अ नाईस डे अहिड.......... केबिन क्रू टू प्रिपेयर फॉर लॅंडींग ..........” विमानाच्या कॅप्टनने अत्यंत रुक्ष आणि दगडी आवाजात हा संदेश दिला. विमानातले पीए हे शॉर्ट-वेव्ह रेडियोच्या आवाजातच का देतात माहीत नाही. अनेक प्रवासी अचानकपणे आणि एकत्रित चुळबुळ करू लागले. (विमानाची चाकं जमिनीला टेकेपर्यंत हालून डुलून काही उपयोग नसतो. नसत्या सवयी असतात लोकांना ! अगदी मुंबई ते अहमदाबाद हा 55 मिनिटांचा प्रवास असला तरीही असले लोक टेक-ऑफ झाल्यानंतर लगेचच संडासाकडे पळतात........हल्ली विमानात काहीही फुकट मिळत नाही मग असले लोक सारखे सारखे अलार्म दाबून प्यायला पाणी, कानात घालायला कापूस असले काहीतरी मागत राहतात. असो विषयांतराबद्दल क्षमा असावी) मी आणखी पाचे मिनिटे झोपायला मिळणार म्हणून खुश झालो. च्यायला, इंदौरला सकाळी 10 ची मीटिंग असली की आदल्या रात्री दोनला घरातून निघायचे, कार मुंबई विमानतळावर पार्क करून 6.25 चे विमान पकडून पुढे जायचे आणि झोपेची वाट लावून घ्यायची. तरीही इंदौरला जायला मिळालं की मी अत्यानंदात असतो त्याचं एकच कारण म्हणजे “सराफा” ! सराफा ही काय चीज आहे हे इंदौरला गेल्याशिवाय कळणार नाही.

इंदौर म्हणजे मराठी आणि उत्तरेकडील संस्कृतीचं यथार्थ मिश्रण. आल्हादकारक हवा, सुरेख आणि टुमदार शहर, आणि खाण्याची रेलचेल. होळकर, पवार इत्यादि मराठी लोकांचीच इंदौर, देवास ही संस्थानं. त्यामुळं इथली भाषा मराठी मिश्रित हिन्दी. खरंतर या दोनही भाषा आपापल्या ठायी रांगड्या असल्या तरी इथल्या भाषेत निव्वळ गोडवा उतरलाय. आणि हा गोडवा अहमदाबाद किंवा जयपूरचा छद्मी गोडवा नाही तर भाबडा गोडवा आहे.

खाणं-पिणं तर भलतच राजेशाही. पंचवीसेक प्रकारची शेव, चिवडा इथे मिळतो. “सराफा” म्हणजे सराफा-बाजार हा तर कळस. दिवसा इथे सोन्याची दुकानदारी चालते. रात्र पडू लागली की त्याच सोनारांच्या दुकानाच्या पायर्‍यांवर असंख्य खाण्याची दुकाने सजतात. इथले लोकही खाण्याचे शौकीन! रात्री 8-8.30 ला घरचं जेवण-खाण उरकून “सराफे चलना है जी !“ म्हणत तडक सराफा गाठतात. इथल्या प्रत्येक पदार्थाची चव वेगळी आहे; आयुष्यभर स्मरणात राहिल अशी आहे.

सुरुवात, कचोरीने करायची आणि मग, धीरे धीरे एकेक आस्वाद घेत दोन-तीन तास सहज निघून जातात. पानी के पतासे (पाणीपुरी), छोले-टिककी-चाट, भुट्टे का कीस (मक्याच्या कणसाचा खीस), फरीयाली (उपासाचे) गराडू, मूंग के भजीये, दही–बडा (हा खरोखर बडाअसलेला वडा असतो) असले तिखट संप्रदायातले पदार्थ रिचवुन मग मोर्चा गोडाकडे वळवायचा. त्यात मालपुवे, हाताच्या पंजाइतकी मोठ्ठी जिलेबी, मूंग का हलवा (यात जवळपास 50% शुद्ध तूप असते) असली भर करायची आणि शेवटी शिकंजी नावाच्या भरपूर सुकामेवा ठासलेल्या खाद्यरूप पेयाचा गिलावा लावून सराफातून बाहेर पडायचे. (डीस्क्लेमर: जेवणानंतर बाकी पदार्थ खाऊन वर ही शिकंजी खाणे किंवा पिणे हे रोज 4 मैल चालल्याशिवाय शक्य होत नाही. डाएटवाल्या माणसांनी उगीच तब्येतीवर बेतेल इतकं चरु नये ही विनंती). या सगळ्याचा माणशी खर्च शे-दीडशे रूपड्यांच्या वर नाही.

राजवाड्यावर खास मसाला पान खाऊन खाद्य-यात्रेचा समारोप करायचा. इथे पान आपल्या हातात घेऊन खात नाहीत. पानवाला तुमच्या तोंडाच्या (“आ” वासल्यानंतर) दिडपट रुंदीचे पान तुमच्या तोंडात कोंबतो. पैसे किती झाले हे विचारताच येत नाही. गपचूप नोट काढून त्याच्या हातावर टिकवली की उरलेले परत केलेले पैसे मोजायलाही वेळ मिळत नाही, दुसरा शौकीन मागे रांगेत उभा असतो. ..........कारण “शौक बडी चीज है”.

इंदौरचे (खुद्द इंदौरचे; उपरे नव्हे) लोकही बर्‍यापैकी गोड आणि भाबडे. रिक्षावाल्याने फसवलं असं मला तरी अनुभवाला आलेलं नाही. पत्ता कुणीही आपुलकीने सांगेल. भाजीवालेही चांगली भाजी अगदी माफक किमतीत विकतात (मी भाजी इंदौरमध्ये का घेतो?...........माझं आडनाव फडके आहे......आपल्यासारख्या सुज्ञ जनांना यापेक्षा अधिक काय सांगावे ?). अर्थात, नेहेमी पुण्यात राहून मध्येच इंदौरला गेलो की Oasis आल्यासारखं वाटणं स्वाभाविक आहे. पण काही म्हणा इंदौर फारच आनंद देतं.  

तिथून परत निघालो की उगीचच रुख-रुख लागते. मन भरलेलं असून काही तरी राहून गेल्यासारखं वाटतं.