रविवार, ९ डिसेंबर, २०१२

चवीने खाणार त्याला...........


मी शाकाहारी. देशावरचे (कोकणातले नाही!) मांसाहारी जन आम्हाला (शाकाहारी लोकांना) गवत खाणारेच समजतात. पण मला त्याचं वैषम्य वाटत नाही (कोल्हयाला द्राक्षं आंबट !) त्याचं असं आहे, मी खाद्य-भक्त आहे. त्यामुळं मी पंथ मानत नाही. शाकाहारी असलो तरी मांसाहाराला तुच्छ लेखत नाही कारण चवीने खाणं हे एक कमावण्याचं कसब आहे. एखादा पदार्थ साधा आहे किंवा स्पेशल या पेक्षा गुणवत्तेच्या निकषांवर माझ्यासारखे खवय्ये त्याचं मूल्यमापन करतात.
वानगीदाखल, नुसता वरणभात घ्या – तांदूळ कुठला, कसा शिजवला, वरणात मीठ, हळद, किती हिंग लावलेय की नाही, या सगळ्यावर त्याची चव अवलंबून आहे. पहिला घास खाल्ल्या-खाल्ल्या हे सगळं समजायला हवं. यालाच कसब म्हणतात. (अधिक माहितीसाठी: असला बेंच-मार्क वरणभात मिरजेला दत्त मंगल कार्यालयात मिळतो.) चोखंदळपणे आणि अचूक खाद्य समीक्षा करण्यासाठी चवीनं खाणं आवश्यक आहे. किती खाल्लं हे महत्वाचं नाही. आदरणीय “पुलं”नी लिहिलाय “शंभर लाडू खाणार्‍याला खवैय्या म्हणणं हे शंभर गाणी म्हणणार्‍याला गवैय्या म्हणण्याइतकं चुकीचं आहे”
लहानपणापासून आज्जीच्या हातचं खाल्लं असल्यामुळे उत्तम चव अस्मादिकांच्या जिभेवर पक्की बसलेली आहे. पुरणपोळी खाताक्षणी त्यातला गूळ कसला आहे किंवा साखर मिसळली आहे किंवा नाही हे मी ओळखू शकतो, कधीमधी घरी “कणीक जरा कमी वेळ तिंबली जावी” किंवा “मोदकाची उकड जरा तेल जास्त लावून अर्ध्या वाफेवर काढा” असले सल्ले / कमेन्ट केल्याने घरच्यांचा रोष ओढवून घेतलाय. वरण वाढून घेताना “कुकरला एक शिट्टी कमी दिली का?” हा प्रश्न विचारल्यावर सहचारिणीच्या चेहेर्‍यावर आश्चर्य मिश्रित राग पाहिला आणि “तुझे फार लाड केलेत तुझ्या आज्जीनं ! म्हणून असले चोचले आहेत तुझे !” हा शेरा मिळाला. मला पदार्थ अधिकाधिक उत्तम कसा होतो हे माहीत आहे पण स्वयंपाक जमत नाही. (तसं असतं तर द्वारकानाथ सांझगिरी यांनी गावस्करांचे रेकॉर्डही मोडले असते नाही का?) 
साखरेचं खाणार त्याला देव देणार” या म्हणीचा लौकिक किंवा गर्भितार्थ जरी काहीही असला तरी मला त्याचा शब्दश: अर्थच भावतो कारण मी गोडघाश्या आहे. रोजचं जेवण गोडाशिवाय पूर्णच होत नाही. पक्वान्न असेल तर उत्तमच, पण नसेल तर अगदी गूळ-तूप, तूप-साखर, दूध-साखर, शिकरण असलं काहीही चालतं. ताटातला पदार्थ साधाच असला तरी तो किती उत्कृष्ट दर्जाचा आहे यावर जेवणाचं समाधान ठरतं. मग मुगाच्या डाळीची खिचडी गरमगरम खिचडी, कढी आणि परातभर मिरगुंडं (मिरगुंड खाताना ठसका लागला नाही तर ती पडीक बियरसारखी “फ्लॅट” झालीत आहेत हे समजावे) हा बेत असुदे किंवा पुरणाचे कडबू, कटाची आमटी आणि भात असला खास श्रावणमासी बेत असुदे; तृप्तता सारखीच.
जिन्नसाची खरी चव जाणायला जिभेबरोबरच नाकही तेज आणि तरबेज असणं गरजेचं आहे. वासाची जाणीव नसताना, भातावर घातलेले तूप वा पामतेल सारखेच, गोळ्याच्या सांबारावरची वाफ आणि अंघोळीच्या पाण्यावरची वाफ सारखीच. उगाळलेले जायफळ आणि गोपीचंदन सारखेच. म्हणून सर्दी झाल्यावर फक्त साबूदाण्याची खीर खावी हे बरे.
काही पदार्थांच्या चवीला प्रसंगाची पार्श्वभूमी असावीच लागते. म्हणजे वडापाव नाटक किंवा सिनेमाच्या मध्यंतरात जास्तच झकास लागतो. सांगलीत असताना फक्त श्राद्धाला खाल्लेली अळूची पातळ भाजी पुण्यात लग्नाच्या पंगतीत तितकीशी पसंत पडली नाही. उशिरापर्यंत चालणार्‍या सीमंतपूजनाला रात्री सुधारसही पक्वान्न वाटतो. दसर्‍याला श्रीखंड, किंवा बासुंदी शिवाय मजा नाही. गौरीच्या जेवणाला पुरणपोळीच हवी (पण कटाची आमटी दुसर्‍या दिवशी शिळ्या भाताबरोबा जास्त चविष्ट लागते). गुलाबजाम हा थोडा आपुलकी नसलेला वाटतो म्हणून कुठल्याही प्रसंगी खपवता येतो. रस-युक्त असूनही बर्‍यापैकी नीरस असं हे पक्वान्न आहे. पण वॅनीला आईस्क्रीमसोबत गरम गुलाबजाम म्हणजे खासा बेत !   
मुख्य जेवणाबरोबरच डाव्या-उजव्या बाजूचे पदार्थही महत्वाचे. त्यातल्या त्यात ताक हा पदार्थ मन ओतून घुसळला तरच रुचकर अन्यथा फक्त द्रव. (“भगत ताराचंद” नावच्या हॉटेलात बियरच्या बाटलीत ताक मिळते, ते जेवणाआधी प्याल तर जेवणच होणार नाही, भांगे सारखीच चटक लागेल आणि नुसते ताकच मागवत बसाल!) कोशिंबीर “पूना गेस्ट हाऊस” पेरु-गेट यांच्यासारख्या चवीची मी इतर कुठेही खाल्ली नाही. माइनमुळ्याचं लोणचं मला कुणी वाढलं तर मी दोनदा “अन्नदाता सुखी भव |” म्हणतो.
आज्जी असताना वार्षिक चार राजेशाही उपास असत (आषाढी-कार्तिकी या दोन एकादश्या, महाशिवरात्र, अंगारकी-चतुर्थी). या दिवशी आमचेकडे साबूदाण्याची खिचडी, वर्‍याचे तांदूळ, बटाट्याचा शिरा, रताळ्याचे गुळातले काप, तळणीचे पदार्थ, उकडलेल्या शेंगदाण्याची उसळ, आणि सर्वोत्तम दाण्याची आमटी असा साग्रसंगीत स्वयंपाक असायचा. सध्या हे ही उपास फक्त खिचडी, शिंगाड्याचे थालीपीठ असे एकजिनसी भागवले जातात. असो.
शेवटी जाता जाता  काही टिप्स.........साधेच पदार्थ चढया दर्जाचे करण्यासाठी किंवा भासवण्यासाठी J
गरम गरम पोळ्या वाढायच्या असतील तर लाटताना थोडा ओवा पेरा. पिठले करताना डाळीच्या पिठाबरोबरच एक चमचा ज्वारीचं पीठ घाला. शिळ्या पोळ्या / शिळी आमटी यापासून चकुल्या करताना आल्याचा तुकडा ठेचून टाका आणि मग उकळी आणा. आळलेले तूप डायरेक्ट गॅसवर गरम करू नका त्या ऐवजी एका पातेल्यात पाणी गरम करून त्याने तूप वितळू द्या.  मूग-डाळ खिचडी पातेल्यात अर्धवट शिजवा आणि मग कुकरमध्ये शिट्टी काढा. एक वाटी श्रीखंडावर दोन चमचे साजूक तूप घालून खा (सांगली-स्पेशल). पोळीचा लाडू करताना कढईत तूप तापल्यावर त्यात गूळ टाका आणि तो वितळल्यावर मग पोळीचा चुरा घाला.  मिरचीचा ठेचा (केळकर स्टाइल) शेंगतेलापेक्षा खोबरेल तेल घालू खा. अंबाडीची गोळा भाजी चुकली तर त्यात मूठभर भडंग (सांगली-स्पेशल) मिसळा आणि अदृश्य होईतो घोटा आणि मग भाजी वाढा; चुकलेल्या भाजीचंही कौतुक होईल !

बुधवार, २८ नोव्हेंबर, २०१२

मंडई ........डोक्याची !

आम्ही दोघे मंडईत जातो (आता मंडईत जाणारे "दोघे" हे बहुधा नवरा-बायकोच असतात ...आम्हीही तेच "दोघे" असतो. अर्थात आम्ही कनिष्ठ मध्यमवर्गीय, त्यामुळे अजूनही मंडईतून किंवा यार्डातून भाजी आणणे हा प्रघात सुरू आहे. क्वचित अगदी गरज म्हणून दारावर येणारी, जवळच्या किराणा दुकानात मिळणारी, किंवा फोन करून घरपोच मिळणारी भाजी घेतली तरी मनात रुख रुख लागते असो. "फडके" आडनाव म्हणजे हे असंच असायचं.)
माझी एक सवय आहे. मी नेहेमी अख्खी मंडई आधी फिरून बघून घेतो आणि मग भाजी घ्यायला सुरुवात करतो म्हणजे कुठे काय काय माल आहे, साधारण दर काय आहे वगैरे वगैरे कळतं. इथे आमच्यात पहिला मतभेद होतो. तिच्या म्हणण्याप्रमाणे पटकन जे चांगलं दिसेल ते घेऊन मोकळं व्हायचं, काम कमी होतं ना ? छ्या! बाजार करणं हे काय उरकून टाकायचं काम आहे? हाताला हात लाऊन मम म्हणण्यासारखं? चांगले दोनेक तास काढून भाजीला जावं आख्खी मंडई पालथी घालावी आणि मस्तपैकी भाजी अगदी जोखून घेऊन परत यावं. उरकायचा बाजार यार्डात करायचा ! मंडईत फिरताना प्रदर्शन बघितल्याप्रमाणे फिरावं, त्यात मजा आहे. पण इकडे पटेल तर शपथ. उलट त्या डिपार्टमेंटल स्टोअर मध्ये ही पूर्ण दिवस घालवेल आणि निम्मी खरेदी बिनाकामाच्या वस्तूंची करेल. वर तसं म्हणावं तर "लागतात ! तुला कळत नाही" ही एकच मात्रा चालवेल. हिला कळणार्‍या गोष्टी मला का कळत नाहीत हे मला अजूनही कळलं नाहीये.
आधी कांदे बटाटे घ्यावेत, मग फळभाज्या, सर्वात शेवटी पालेभाज्या, टोमॅटो आणि केळी - हा मला मिळालेला पाठ. इथे दूसरा मतभेद! "आधी कांदे बटाटे घेऊन कशाला ओझं वागवत फिरायचं? शेवटी वेगळ्या पिशवीत घेऊ." (खरं तर सगळं ओझं मीच वागवतो) पण इथे थोडा दोष माझा आहे. भाजी घेतल्यावर माझ्या हातात असणार्‍या एकूण पिशव्या आणि घरी आल्यावर केलेली मोजदाद कधीच जुळत नाही (काय वेंधळा आहेस !, विसरलास वाटतं !, काय करावं ह्या माणसाला ! गाडीत ठेवली होतीस का पिशवी ? काही आठवतंय का? धन्य रे बाबा ! ............... इ. इ. आवाजी फटाके) म्हणून मी नेहेमी दोनच मोठ्या पिशव्या घेण्याबाबत आग्रही असतो, तिसरी पिशवी वाढवायची म्हणजे माझ्या पोटात गोळा!
कांदे बटाटे, आलं, लसूण, मिरच्या, कोथिंबीर, कढीलिंब हे प्लॅटफॉर्म जिन्नस सोडता तिसरा मतभेद भाज्यांच्या निवडीच्या बाबतीत असतो इथे मात्र दोघांच्याही मुत्सद्दीपणाचा कस लागतो. पूर्वी जसा म्हशींसाठीचा "मिलो" रोजगार हमीचे दुष्काळी खाद्य म्हणून आपल्याकडे आला तसंच कोबी, नवलकोल ह्या भाज्या जनावरांच्यासाठी निर्माण झाल्यात असं माझं ठाम मत आहे. हिला कोबी, नवलकोल, पडवळ, दुधी भोपळा, सुरण असल्या नीरस ताटभरू गर्दीच्या भाज्या घेण्यात पराकोटीची धन्यता वाटते. पाहुणे येणार नसले तरीही ही असल्या भाज्या घेते. मी मात्र वांगी, भेंडी, कारले, फुलकोबी, ढब्बुमिरची, असल्या रसना तृप्त करणार्‍या भाज्यांच्या बाजूने असतो. मेथी मला आवडत नाही (माझा दोष), अंबाडी हिला करता येत नाही (माझाच दोष.........कसा?......आपण सूज्ञ आहात!), उरता उरले पालक, पोकळा आणि लाल माठ; जे घेऊन घेऊन किती घेणार? शेवटी ज्याचा दिवस असतो त्याचा विजय होतो आणि त्याप्रमाणे भाजी आणली जाते.
बहुतेक सर्वच संसारी घरांत असले चित्र असेल. नाहीतर मटकी, चवळी, मसूर, यासारखी तद्दन मंगल कार्यालय छाप किंवा मेस छाप(घरगुती खानावळ) कडधान्ये दरमहा किमान पावकिलो रतीबाने घराघरांत आलीच नसती

रविवार, १८ नोव्हेंबर, २०१२

Joy of Giving

"उद्या सकाळी ऑफिसला जाता जाता भेटून जा" बायको मला सांगत होती. मी जेवता जेवता मान डोलावली. नात्यातले एक गृहस्थ अॅडमिट होते त्यांना भेटायला जायचं होतं. दुसरे दिवशी सकाळी निघालो. निम्म्या रस्त्यात बायकोचा फोन ...."आज डब्यात तुपासाखर पोळी गुंडाळून दिलीये......आणि तू पाकीट घरी विसरून गेलायस". काहीतरि जुजबी उत्तर देऊन मी फोन ठेवला. मग ध्यानात आलं च्यायला पाकीट विसरलो म्हणजे पैसे, कार्ड , लायसेन्स सगळं घरीच. आता रिकाम्या हातानेच भेटायला जावं लागेल. तसंही बाकीच्यानी भलते फळं, बिस्किटं आणलं असेलच की; असला सोयिस्कर स्वार्थी विचार करून मी दवाखान्यात गेलो. सदर गृहस्थ ग्लानीत होते. सलाईन लावलं होतं. तसं दवाखान्यात वर्दळ अगदी कमी होती. पेशंटही कमीच होते. यांच्याजवळ कुणीच नव्हतं म्हणून शिफ्ट च्या सिस्टरकडे चौकशी केली तर त्या म्हणल्या की आत्ताच घरी गेलेत. अर्धा तासात आवरून येतील. (चला म्हणजे मी हात हलवत आलोय हे कळणार नाहीच....पुन्हा सोयीस्कर स्वार्थी विचार). मी त्यांच्या तब्येतीविषयी विचारले. "यांना अन्न जात नाहीये. तीन दिवस काहीही खाल्लेले नाही" (मग मी फळं, बिस्किटे आणून काय उपयोग ? .......... पुन्हा तोच सोयिस्कर स्वार्थी विचार). थोडा वेळ वाट बघितली पण पेशंटकडे कोणी आले नाही. मी सिस्टरकडे निरोप ठेवून बाहेर येऊ लागलो.
"ए प्वोरा !" जनरल वार्डाजवळ एक टोपीवाला गावकरी तात्या बसून होता. त्याने मला हाक मारली. "माजा ल्योक गावास्न येव रायलाय, मला आडमिट करनार हायेत पन त्येनला येळ लागंल. काय बाय खायला पायजेल. तवा एक धा रुपे दिशील काय ? मी माळकरी हाय. यष्टीला पैसं सपलं बग" तो म्हणाला..................झाली पंचाईत! मी ऑफिसच्या ड्रेसकोडमध्ये टकाटक, आणि खिशात दमडा नाही. वेळ सुद्धा वेळ साधून येते ! पैसे नाही म्हणावे तर त्याच्याच समोर मी गाडी काढून निघणार होतो. मला काही सुचेना, त्याला हाताने पाच मिनिटे थांब अशी खूण करून मोबाइल कानाशी लाऊन मी उगीचच इकडे तिकडे बघू लागलो. शेवटी धीर केला आणि त्याला सगळी परिस्थिति सांगितली. आणि म्हणालो "बाबा, माझ्याकडे खरंच पैसे नाहीयेत. पण माझा डबा आहे तो तुम्हाला चालेल का ?" तो हसून हो म्हणाला. मी माझा डबा त्याला दिला त्याने अधाशीपणे तो संपवला. आणि रिकामा मला परत दिला (टप्परवेयर चा डबा , परत नेलाच पाहिजे अन्यथा घरी शिव्यांची ओवाळणी झाली असती).
मी ऑफिसला आलो, कंपनीच्या वेबसाइटवर CSR चा "Joy of Giving" एव्हेंट दिसत होता......................दीड वाजता सगळे जेवायला गेले. मी कामच करत राहिलो............"joy of Giving" ने माझं पोट सकाळीच तुडुंब भरलं होतं.

बुधवार, २४ ऑक्टोबर, २०१२

सीमोल्लंघन


“नवरात्र संपले दसरा उजाडला; मोरुचा बाप मोरूला म्हणाला – मोरू, उठ लवकर”...................या दर दसर्‍याला आठवणार्‍या वाक्याने आजचा दसराही उजाडला आहे. लवकर उठून सगळी अन्हिके आटोपली आहेत. देवाची पूजाही झालीये. सुट्टी असल्याने कार्तिकी एकादशीचा देवाच्या मूर्ति घासण्याचा उद्योग आजच केला आहे. चकचकीत देवबाप्पा खरोखरच फ्रेश दिसतोय. घरीदारी, गाड्यांना तोरणे लावलीयेत हार घातलेत. खास सांगलीहून बासुंदी मागवलीये. जेवणाचा बेत हळू हळू आकार घेतोय.

पण आज मी काही तरी नवीन केलेय. खरंतर नवीन काहीच नाहीये मात्र एक जुनं टाकायचा निर्णय घेतलाय आणि तो अंमलात आणलाय............ आपटा-शमी तोडणार नाही, तोडलेले विकत घेणार नाही आणि वाटणारही नाही ! एक तिथी उलटल्यावर ज्या सोन्याचा कचरा होतो असलं आशाश्वत वाण फक्त परंपरेच्या नावाखाली वाटत फिरायचं ? वारांगनेचीही इतकी उपेक्षा होत नसेल ! मला तर हे पटत नाहीये म्हणूनच मी ही परंपरा मोडण्याचा (खरे तर सुधारण्याचा) प्रयत्न करणार आहे. सोन्यासारख्या या वृक्षश्रेष्ठांचं परंपरेनं सांगितलेलं महत्व मी जाणलंय, ओळखलंय. मी परंपरेचा प्रचंड आदर करतो आणि म्हणूनच परंपरेचा विपर्यास मला बघवत नाही. शाळेची कळू लागल्यास मोजलेली सहा वर्षं “...........या देशाच्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन...............” रोज मी ही दोन वाक्यं प्रतिज्ञेत म्हटली. आज मला अभिमान आहे मी त्या परंपरांचा पाइक होण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे.

अंधानुकरण करणे आणि परंपरा पाळणे यात मोठा फरक आहे. पण त्या फरकाची रेषा सूक्ष्म आहे. मला या थोर परंपरेला बांधील राहायचं आहे. माझ्या ओळखीच्या एका माळीबाबांना मी आपट्याचं बोन्साय मागितलं आहे (जागे अभावी मोठं झाड लावणं अशक्य आहे.). डिसेंबरअखेर ते माझ्याकडे येईल. मी ते जोपासेन. पुढच्या आणि त्यानंतरच्या प्रत्येक दसर्‍याला त्याचं मनोभावे पूजन करीन. शक्य झाल्यास पानांऐवजी झाडेच वाटेन. प्रथा-परंपरेचा वैश्विक कल्याणकारी अर्थ जाणून न घेता फक्त त्यांच्या भौतिक बंधनांत अडकलेली माझीच माणसं माझ्यावर टीका करतील. पण मी त्याही बंधनांच्या सीमा उल्लंघिलेल्या आहेत.

रविवार, २३ सप्टेंबर, २०१२

मध्या

मध्याचं प्रोव्हीजनल स्टोअर आहे. दुकानाचं नाव काहीही असलं तरी तरी ते "मध्याचं दुकान" म्हणूनच ओळखलं जातं. मध्या पन्नाशीचा असेल म्हणून मी आणि माझ्या वयाची सगळी मंडळी त्याला म्हदबा म्हणतो. मध्याचं दुकान म्हणजे भरगच्च माल. मध्याकडे किराणा - भुसार या प्रकारात बसणारं सगळं मिळतं ( किराणा माहीत आहे पण भुसार म्हणजे नक्की काय ते मला अजून समजलेलं नाही) . त्याचा वाडा आहे त्यातच पुढच्या बाजूला दुकान आहे. सकाळी 6.00 वाजता दुकान उघडतं (येथे दूध, पाव, अंडी वगैरे काही मिळत नाही फक्त किराणा - भुसार !). सांगली सारख्या मध्यम शहरात असली दुकानं अजून आहेत. डिपार्टमेंटल स्टोअर ची लागण हल्ली व्हायला लागलीये पण तितकीशी नाही.
गेली कित्येक वर्षं मी म्हदबाला पाहतो आहे. कळकट पंचा, मुळची सफेद पण सध्या अगम्य रंगाची बाहयांची सुती बंडी , कानावर पेन, भरपूर तेल लावून चप्प बसवलेले केस, कपाळावर टिळा, आणि सदा हसतमुख तोंडवळा ! मध्याची दाढी कधीच वाढलेली मी पाहिली नाही. मी सकाळी पोहायला नदीवर जाताना मध्या दुकान उघडून उदबत्ती वगैरे लावताना दिसतो. शिवाय आमचा "किराणा भुसार" भरणा मध्याच्या दुकानातूनच होत असे. या महिन्यातले पैसे पुढच्या महिन्याच्या यादीबरोबर द्यायचे हा व्यवहार असे. एक महिन्याचे बिन-व्याजी क्रेडिट मिळायचे. एखादं लहान मूल दुकानात आलं तर त्याला खडीसाखर दिल्यावरच मध्या इतर गि-हाईकांकडे बघायचा.
मध्याच्या दुकानात अगदी चार-आठ आण्यात चहा, साखर, बाटलीतून तेल, मीठ-मोहरी, घेऊन जाणारं गिर्‍हाइक येत असे. मध्याच्या मुलानं एकदा त्याला त्यातला तोटा गणित करून सांगितला होता पण मध्या म्हणाला "त्यांची कमाई ती काय ? रोजंदारीवर जगणारी माणसं ती. दोन घास त्यांच्या पोटात समाधानानं जात असतील तर तोटा झाला तरी काही बिघडत नाही." मध्याची परिस्थिति चांगली होती. मुलांची शिक्षणं, मुलीचं लग्न सगळं अगदी व्यवस्थित केलं. पण दुकान म्हणजे त्याचा जीव की प्राण. एकही दिवस दुकान बंद नाही. मध्या जवळपास आमच्या भागातल्या सगळ्या लग्न-मुंजीत हजार राहायचा बहुतेक सगळे त्याचेच ग्राहक शिवाय घरच्या कार्याला सामान मध्यानंच दिलेलं स्पेशल क्रेडिटवर !
मध्या त्याचा व्यवसाय अगदी नेटका करायचा. गणपती उत्सवाला कधी कुणाला वर्गणी द्यायचा नाही पण मंडळाच्या सत्यनारायण पूजेला सव्वा किलो साखर मात्र द्यायचा. मी सांगली सोडताना त्याच्या पाया पडायला गेलो होतो तेव्हा मध्यानं मला मन भरून आशीर्वाद, एक खडीसाखरेचा खडा आणि एक मोलाचा सल्ला दिला "कुठलंही काम गौण मानू नको. सगळी कामं मनापासून आणि वेळच्या वेळी करत जा रे! यशस्वी हो !" आणि त्यानं माझ्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला. म्हदबा तेव्हा मला या जगाला अठरा व्यवहार्य योग सांगून "योगक्षेमं वहाम्यहम" म्हणणार्‍या श्रीकृष्णासारखा भासला.

शनिवार, २५ ऑगस्ट, २०१२

जिमी

मला पक्षी आणि प्राणी फार आवडतात  (म्हणजे पाळण्याजोगे सजीव. मनुष्य प्राणी पाळण्याजोगा नाहीये, आणि यदाकदाचित असला तरी मी गुलामगिरीचा पुरस्कार करीत नाही.....आणि हो, मी नवाब नाही). माझ्या आबांनाही (आजोबा) प्राणी आवडत. त्यामुळे घरी प्राणी पाळण्याला (म्हणजे आणण्याला- कारण आज्जीने सगळे प्राणी हाकलून दिले फक्त कुत्रं राहू दिलं) त्यांचं प्रोत्साहन असे. कुत्रे, मांजर, खार, पिंगळा (घुबड), वटवाघूळ, कबुतर, कासव, ससा, हे प्राणीपालन अनुभव माझ्या गाठीशी आहेत.
 
आबांनी मला त्यांच्या काळाची एक आठवण सांगितली --  त्यांचे वडील (माझे पणजोबा), त्यांना सगळे बापू म्हणत; हुबळीला रेल्वेमधे पार्सल ऑफिसर होते. त्यांनी एकदा कोटाच्या खिशातून कुत्र्याची दोन पिल्ले आणली एक फॉक्स-टेरियर (जॅक) दुसरं स्पेनियल (जिमी). दोन्ही गुणी कुत्री घरी छान रमली. जिमीला बापूंचा जास्त लळा होता. बापू ड्यूटीला निघाले की जिमी त्यांच्या सोबतीला स्टेशनपर्यंत जात असे आणि उलट्या पावली परतत असे. काही दिवसांनी जिमीला परतायला नेहमीपेक्षा जास्त वेळ लागू लागला. काही शेजा-यांनी संगितले की जिमी स्टेशनजवळच्या मटणाच्या दुकानासमोर बसलेली असते. खात्री केली - खरेच होते. घरी हलकल्लोळ झाला.  सर्वांना मनस्वी दु:ख झालं. पण सोवळ्या घरात मांसाहारी कुत्रं ? आलवणातल्या खापर पणजीने तर "जिमी मनेयल्ली तगेदू कोंडरे नानु निल्लुवदिल्ला (जिमीला घरात घ्यायचे नाही अन्यथा मी घर सोडते)" असे निक्षून सांगितले. (इथे शाकाहार-मांसाहार असा वाद नाहीये. कुत्र्यांना काय खायला घालावं किंवा सोवळं चांगलं की वाईट ही देखील चर्चा नाहीये). शेवटी बापूंनी एका ओळखीच्या गार्ड करवी जिमीला रेल्वेच्या पेटबॉक्स मध्ये घालून बेळ्ळारी रूटवर कुठेतरी सोडून देण्याची व्यवस्था केली.
 
त्यानंतर घरात दोन दिवस सुने सुने गेले. जॅकही दोन दिवस सोप्यात बसून राहिला. तिसरे दिवशी पहाटे पणजीने सडा घालायला कवाड काढले तर जिमी पायरीवर बसलेली होती. सगळ्या घरात चैतन्य आलं. बिच्चारी सुमारे 25 कोस अंतर तुडवत आली होती. बापूंनी तिला घरात घेतलं, प्रेमानं कुरवाळलं, खाऊ-पिऊ घातलं. जॅकनंही उड्यामारून आनंद व्यक्त केला............... त्या दिवसापासून मरेपर्यंत जिमी कधीही मटणाच्या दुकानाकडे फिरकली नाही.
 
1999 साली मी सिगारेट ओढत असल्याचं आबांना कळल्यावर त्यांनी मला तसं न करण्यास सांगितलं होतं. त्या नंतर दहा वर्षानी म्हणजे 2009 ला मी सिगारेट सोडली...............चांगले संस्कार अंगी बाणण्यात माझ्यापेक्षा जिमीच सरस होती.

चुका

       श्रीकर तसा माझा मित्रच पण माझ्यापेक्षा वयाने तब्बल बारा वर्षे मोठा. आमच्या घरापासून तिसरं घर त्याचं (हो त्याचंच म्हणायला हवं, कारण त्यानंच ते विकत घेतलं होतं). मी नुकतं शिक्षण पूर्ण करत असताना तो स्थिरावला होता. स्वभावाने सालस. कष्टाळू, आणि जबाबदार. आई वडील दोघेही अपघातात वारले. अगदी सावलीही साथ सोडेल इतकी बिकट परिस्थिति असून श्रीकरने कुठेही हात न पसरता सगळं पेललं आणि पचवलं पण कधीही चेहेर्‍यावर जाणवू दिलं नाही. माझ्या आणि त्याच्या मैत्रीचा धागा म्हणजे संगीत नाटक आणि "ऑस्कर वाइल्ड". ऑस्कर वाइल्ड मी वाचत होतो म्हणून मला आवडायचा आणि त्यानं वाचला होता म्हणून त्याला आवडायचा नाही.

     आणखी एक दुवा होता तो म्हणजे आमच्या समोर राहणारी "शाल्मली" (माझी बिन नात्याची ताई). ही एक ध्येयवादी मुलगी  होती. तिचा जगण्याचा रोडमॅप तयार होता आणि ती तो अनुसरत होती. श्रीकरला ती आवडायची. त्यानं तिला प्रपोजहि केलं होतं पण तिनं नकार दिला. तेव्हा श्रीकर मला म्हणाला " मी तिच्यात गुंतलोय रे !, मी चूक केली तिच्यावर प्रेम करून!". तिच्या वडिलांच्या इच्छेनुसार तिनं लग्न केलं. आणि इथंच सगळं बिनसलं. शाल्मलीचा मधुचंद्रापासूनच छळ सुरू झाला. तिनं नवर्‍याशी फारकत घेतली आणि करिअरचा रस्ता धरला. मी फोन केल्यावर म्हणाली की " लग्न करून माझी घोडचूक झाली". 

          दहा वर्षं भराभर सरकली. इकडे श्रीकर लग्न-बिग्न न करता राहिला होता. व्यवसायात त्यानं चांगला जम बसवला होता.  एके दिवशी माझ्या घराची बेल वाजली. बघतो तर श्रीकर होता. आश्चर्य मावळेपर्यंत मागून शाल्मली जिना चढताना दिसत होती. मी कोसळायच्या बेतात होतो. दोघे लग्न करणार होते बोलावणं करायला आले होते. साक्षीदार म्हणून मी सही केली. दोघांनी एकमेकांना पेढे भरवले तेव्हा मला आनंदानं रडायचं होतं पण मी रडू शकलो नाही.  

          ऑस्कर वाइल्डने लिहिलंय- "तुम्हाला पुन्हा तरुण व्हायचं असेल तर तरुणपणातल्या चुका पुन्हा करा"........... श्रीकर पुन्हा तिच्यात गुंतलाय; आणि शाल्मलीनं पुन्हा लग्न केलंय.  चाळीशी उलटल्यावर पुन्हा दोघंही तरुण झालेत.......

मंगळवार, २१ ऑगस्ट, २०१२

समाधानाचे डोस... :)

घराजवळच्या एका दुकानात "स्वामी संदेश" लिहिला आहे. "कोणतेही कारण असो , रागावू नका चिडू नका ..........इ.इ." मी नेहेमी तो वाचतो.

एकदा मी मंडईजवळून (काय बुद्धी सुचली कोण जाणे ?) गाडी (ते ही चार चाकी) घेऊन चाललो होतो गर्दी होतीच. इंच इंच पुढे सरकत असताना कोण्यातरी मालवाहू रिक्शाचा हौदा माझ्या गाडीला घासला. मी तापलो, भर गर्दीत गाडी बंद करून उतरलो आणि त्या रिक्षावाल्याला तावातावाने शिव्या देऊ लागलो. बघे जमले. त्याचीच चूक होती, तो ही काही बोलू शकत नव्हता. माझा पारा चढताच राहिला, कपाळावरची शीर जोरात उडू लागली पण तेव्हाच मला त्या दुकानातला "स्वामी संदेश" आठवला. मी गप्प झालो आणि त्याला म्हणालो " मित्रा , जरा बघून चालवत जा. मला पैसे वगैरे काही नकोत" तो रिक्षावाला माझ्या अनपेक्षित वाक्याने मनमोकळा हसला आणि तो विषय तेथेच संपला. मला आगळं समाधान लाभलं.
 
पुढे एकदा एका म्हातारा-म्हातारीच्या स्कूटरला माझा हलकासा धक्का लागला. चूक कुणाचीच नव्हती. म्हातारा माझ्याकडे कावलेला आविर्भाव करून पुढे गेला. मी ही पुढे जाऊन त्यांना थांबवले ...... म्हाता-याचा चेहेरा लाल झाला पण मी त्या दोघांना सॉरी म्हणालो आणि त्यांची विचारपूस केली.........म्हातारा खुष ! ... म्हातारीही बोळकं वासून हसली आणि माझ्या समाधानाच्या खात्यात भर पडली (खरं म्हणजे दात पडलेली म्हातारी आणि "दात न आलेली" बाळं यांच्या गोड हास्यापुढे मधुबालाजींचं ब्लॅक-व्हाईट फोटोतलं स्मितही फिकं पडेल, या जगाचं दुर्दैव की मधुबालाजी बोळकं होईतो राहिल्या नाहीत). .
 
हल्ली मी रोज रस्त्यावरून जाताना इकडून तिकडून घुसणा-यांना आधी जाऊ देतो. तेही माझ्याकडे बघून हसतात, कुठे घासाघाशी झाली तरीही हसूनच परिस्थिति हाताळतो दुसराही हसतो नि तणाव निवळतो. मी गाडी नियमानेच चालवतो त्यामुळे माझ्याकडून आजपावेतो चूक झालेली नाही परंतु उगीच पाचेक लाखाच्या निर्जीव गाडीकरिता आणि त्या निर्जीव गाडीमागे लपलेल्या मातीमोल अहंकाराकरिता अत्यंत मौल्यवान अशी मन:शांती खर्ची घालणे व्यवहार्य नव्हेच. त्यामुळे समाधानाचा डोस मी चुकवत नाही.
 
पुढे अजून दहा पंधरा वर्षांनी ब्लडप्रेशरच्या गोळीचा डोस घेण्यापेक्षा आतापासूनच समाधानाचे डोस घेतलेले बरे ....नाही का ?

रविवार, १९ ऑगस्ट, २०१२

आज्जीची माया

             रिप रिप पावसात छत्री घेऊन सदाशिव पेठेतून पायी चाललो होतो. कुठून तरी ओळखीचा वास आला. इतका सुंदर वास ...व्वा वा.....! अनपेक्षितपणे संगीताचे सूर कानी पडले तर तिथेच घुटमळायला होतं. तसंच या वासाने घुटमळायला झालं. काही मिनिटे तिथेच उभा राहून डोळे मिटून तो वास भरभरून घेत राहिलो. कुणी सुगरण गरमा-गरम पोळ्या करत असेल तो वास होता. (पोळ्या म्हणजे चपात्या..आमच्याकडे चपात्यांना पोळ्या म्हणतात .. म्हणजे असं बघा ... साध्या पोळ्या, पुरणाच्या पोळ्या, गूळपोळ्या - मुळातली साधी पोळी अधिक त्यामध्ये जे काही भरलं असेल ते नाव.)
 
             तो वास मला सांगलीच्या घरी घेऊन गेला. माझी आज्जी पोळ्या करायची तेव्हा असाच वास घमघमायचा. मी बरोब्बर पोळ्या सुरू असताना पानावर बसायचो. तव्यावरून वाफाळती पोळी तेल लावून थेट पानात यायची. माझी आज्जी सुगरण होती. पोळी लाटताना पोळपाटावरून बाजूला ओसंडायची ....आम्हाला खाऊ घालताना तिचं प्रेमही असंच ओसंडायचं. मी तिची तारीफ केली की लटक्या रागाने म्हणायची "माझे हात गोड नाहीयेत !". काहीही असो पण तिचं प्रेम मात्र त्या पोळ्यांत उतरायचं आणि दरवळायचं हे नक्की. तिचा रांधा कधीच चुकायचा नाही. सगळं कसं अगदी म्हणजे अगदी "परफेक्ट".
 
          तिनं कधी तिची माझ्यावरची माया मुके घेऊन, कुशीत घेऊन व्यक्त केली नाही पण मला वरण हवं असतं म्हणून ती रोज येव्हढंसं साधं वरण काढून ठेवायची.
 
वर्षं सरली ....आज्जीही फोटोत जाऊन बसली........आणि ती गेल्यानंतर माझ्या चारही आत्यांच्या स्वयंपाकात ती चव उतरली. माझं लग्न झाल्यावर सुमारे तीन वर्षांनंतर बायकोच्या पोळ्यांना तसला प्रेमळ वास यायला लागला. कवठ पिकतं तसं प्रेमही पिकावं लागतं बहुतेक ...त्याशिवाय घमघमत नाही (प्रेरणास्रोत: पु.ल.देशपांडे "अंतु बर्वा" ).
 
देवाजीनं आज्जीची माया गोड केली; ....... हात गोड केले नाहीत कारण तो तिला घेऊन जाणार होता ............

मंगळवार, ३१ जुलै, २०१२

बापाची अंगाई.........!

झोप शांत आता बाळा 
बाप जोजवी आज तुला
माझ्याजवळी नाहीत कवने 
ना अंगाई नाही गाणे
हात मात्र पाठीवर ठेवूनि
कवेत घेतो आज तुला
तुला चुंबिता मला वाटते
दाढी माझी तुला टोचते
वळवळून तू त्रासिक हसशी
गंमत वाटे फार मला
आईसम तुज करणे ममता
जमतच नाही मजसी करिता
माया माझी परी अव्यक्ता 
कशी पटवू मी सोनफुला
घरी तू येशी परी मी नसतो
घरी येता तू निद्रित दिसतो
रविवार परी तो आपुला असतो
आणूया भरती आनंदाला
तुझ्या सुखासाठी मी झटतो
तुझ्याचसाठी राब-राबतो
तू चुकता तुज रट्टे देतो
वळ परी उठती मम हृदयाला
आकांक्षांचे ओझे काही
तुझ्यावरी मी लादत नाही
स्वप्ने माझी परी पेरितो
तुझ्या रूपाने उगवायाला
..................................अभिनव

सोमवार, ९ जुलै, २०१२

पावसासाठी बाप्पाची समजावणी ........

आता एकदा बाप्पा माझं ऐकून तरी बघ
दाटलेलं मळभ जरा ढाळून तरी बघ 
लोकांचे ओंगळवाणे धुताना पाप
माहित आहे मला, तुला होतो खूप ताप
विजेचा टाहो जोरा फोडून तरी बघ
दाटलेलं मळभ जरा ढाळून तरी बघ 
धुसफूस करून काय मिळे सांग रे तुला ?
मनालाच खुपतील सगळ्याच सला 
आता तरी धाय जरा मोकलून बघ
दाटलेलं मळभ जरा ढाळून तरी बघ 
तुझ्या पायावरी डोके ठेवूनिया भारे
रचलेले आहेत आम्ही पापाचे ढिगारे
पाय धुण्यासाठी देवा बरसून तरी बघ 
दाटलेलं मळभ जरा ढाळून तरी बघ 
तू मोकळा होताना पाऊस झरेल 
माय माझी हिरवीगार होता बहरेल 
आनंदाची दोन टिपे गाळून तरी बघ
दाटलेलं मळभ जरा ढाळून तरी बघ 
.....................................................अभिनव

गुरुवार, १४ जून, २०१२

षंढ

कधीकधी  पेपर वाचून, बातम्या बघून विचित्र  निराशा येते, स्वत:वरच चिडचिड होते ...मग असा निचरा होतो.

बजबजपुरीस आली भरती
अवती भवती किटाळ चरती
डोके मथ्थड खांद्यावरती, डोळे उघडून बघतो आहे
जिवंत मेली तनू वागवित, षंढ मनाने जगतो आहे.
पांढर पेशा सदरा लेऊन
टापटिपीची ऐट बढावून
भयगंडाचे अस्तर लावून पिंड नासका ढकतो आहे
जिवंत मेली तनू वागवित, षंढ मनाने जगतो आहे.
माझा पैसा माझी गाडी
माझे घर नि माझीच माडी
विश्व थिटे अन नभही किरटे, कवेत घेऊन लपतो आहे
जिवंत मेली तनू वागवित, षंढ मनाने जगतो आहे.
कोणी मेले कोण जळाले
कुणी कुणाचे घास गिळाले
दिवाभीतासम अंधारातून विस्फारुनिया बघतो आहे
जिवंत मेली तनू वागवित, षंढ मनाने जगतो आहे.
अंतर जळते मन कळवळते
रोमांचून जाणिव हुळहुळते
परि हृदयातिल धूर कोंडला विडी ओढूनी फुकतो आहे
जिवंत मेली तनू वागवित, षंढ मनाने जगतो आहे.
मतही दिधले "कर"ही भरले
सगळे जन परि चुतिये ठरले 
कैची मध्ये वृषणे चिमटून केविलवाणे रडतो आहे
जिवंत मेली तनू वागवित, षंढ मनाने जगतो आहे.
प्रश्नच उरले पैसा गेला
मग देवाचा धावा केला
घुसमट झाली तरी धपापत भार खेचूनी तगतो आहे
जिवंत मेली तनू वागवित, षंढ मनाने जगतो आहे.
तीन शेकडा साल चालते
वारी पंढरपूरी धावते
मनी चिंतुनी नाम हरीचे भीमेकाठीच हागतो आहे
जिवंत मेली तनू वागवित, षंढ मनाने जगतो आहे.
                                                ...............................अभिनव 

मंगळवार, १२ जून, २०१२

शाळा सुरू...

जून महिना...पाऊस......शाळा सुरू... नवीन पुस्तके, नवीन गणवेष, नवीन उमेद ......


येता भरून नभ हे जल मेघयाने
होता सुरू झरझरा द्रव पावसाने
जाणोन मीही त्वरिता करि कार्य घेतो
शालेय वर्ष भरता नव वर्गही तो.   || १ ||
"बापूस" नित्य मजला करि कौतुकेही
साहित्य ते नवनवे आणितो त्वरेही
आनंद गंध घमता नव पुस्तकांचा
गणवेषही नविन तो चमके मुलांचा || २ ||
ती माय मजसि ममता देते शिदोरी
आईमधेच वसतो प्रभू चक्रधारी
ताता जननि उभयतां बहु कष्टताती
शिक्षीत मजसी करणे इति ध्येय हाती || ३ ||
शाळा तशीच आमुचि जननी द्वितीया
गुरुवर्य सर्व जन ते तरु-कल्प छाया
गंगौघ सम प्रवाही जणू ज्ञान गंगा
विद्या चिरंतन गमे धवला तरंगा || ४ ||
वंदून नित्य चरणी गुरु माय-ताते
वेचोन ज्ञान कण ते घेतो कराते
कीर्ती जगात करितो माझ्या कुळाची
सेवा करीत राही मम मायभूची || ५ ||
                           .................................अभिनव

मंगळवार, १ मे, २०१२

महाराष्ट्र दिनाच्या निमिताने मराठी बांधवांना विनम्र आवाहन

महाराष्ट्र धर्मा शिरी वागवावे
उगे फालतुचे न सोंगा आणावे
मराठी असे मायभूमी अनन्य
तिला पूजुनीयाचि व्हावे सुधन्य ॥ १ ॥

इथे थोर व्यक्ती, चरित्रेहि झाली
सवे संत साधू व्रतांची झळाळी
इथे नांदती पुण्यक्षेत्रे प्रमोदे
व उद्योगलक्ष्मी सुखेनैव नांदे ॥ २ ॥

इथे मानिती लोक राजा शिवाजी
अशी मातृभूमी महाराष्ट्र माझी
इथे बाळ गंगाधरांचा वसा हो
जिथे पूजिती 'भीम'राजा तसा हो ॥ ३ ॥

महात्मा फुले थोर होऊनि गेले
तयी शिक्षणाचे महत्कार्य केले
चलच्चित्र ते फाळक्यांनि आणिले
हरिश्चंद्र नामे प्रसिध्देहि झाले ॥ ४ ॥

किती सांगु मी शब्द ओठी पुरेना
न वर्णू शके थोरवी मात्र जाणा
सुबुध्दी सुजाणे तुम्हां वीनवीतो
मराठीपणां गर्व जाणां तुम्ही तो ॥ ५ ॥

मराठीतुनी स्वाक्षरी ती करावी
अशी मातृभाषा जनी  कीर्तवावी
मुखे भावना फक्त ना व्यक्त व्हावी
तशी स्वाक्षरीने जगी सिध्द व्हावी ॥ ६ ॥

                               ............ अभिनव.

मंगळवार, १७ एप्रिल, २०१२

वळवाचा पाऊस !


जोराचा सुटतो अनील गगनी माती उडे सर्वही ।

मेघांची गरदी जमे त्वरित ती थेंबे पडू लागती ॥

ऊष्मा होत कमी बळेच थिजती ज्वाळा जणू त्या झळा ।

मातीला सुटला सुवास कसला विश्वातची आगळा ॥१॥

 

गाराही पडती सवे धरिवरि तारांगणे भासती ।

आडावेड कसे जलस्रवण ते सर्वांग ओथंबती ॥

कामातूर प्रिया तथा प्रियकरा विरहात हो चिंतिता ।

सृष्टी मात्र झणी आरोह भरते उन्मत्त हो मन्मथा ॥२॥

 

धाडाडम धडडम धडा धडधडा सौदामिनी गर्जते ।

मेघांच्या पटलावरी क्षण क्षणी प्रक्षुब्ध तेजाळते ॥

तृष्णाक्रांत चराचरावरि जले शिंपीत तो जातसे ।

जीवांना सुखवीतसा वळिव तो वरदानची होतसे ॥३॥

……. अभिनव

मंगळवार, १० एप्रिल, २०१२

घरगुती भांडणाची हलकी फुलकी कविता


पेल्यातलं वादळ कधी कधी पेल्याबाहेर सांडतं

आमचं कलत्र आमच्याशी अगदी निकरानं भांडतं

 

लग्नापासूनचे दाखले झटक्यात सादर होतात

दोघांच्या पायाची आग मस्तकाला नेतात

 

तिच्या डोळ्यात त्वेश अश्रूंनी पूर भरतो

संतापाने गिळायला फक्त आवंढाच उरतो

 

कठोर कटू शब्दांचा प्रचंड भडीमार होतो

खटके उडून छत्तिसाचा आकडा ठिय्या देतो

 

भांड्याला लागतं भांडं क्वचित बशा फुटतात

जेवणाच्या पंगतीही मग वेगवेगळ्या उठतात

 

अबोला लोचट पाहुण्यासारखा मुक्कामाला बसतो

आमचा मुलगा तीन दिवस पोस्टमनच असतो

 

मी शांत होतो नि आधी तिची क्षमा मागतो

तिच्या रागाचा लोंढा मात्र तेव्हढ्यावरच थांबतो

 

पोळ्या, वरण-भाताचा ताजा रांधा शिजतो

संध्याकाळी आईस्क्रीमचा बेत भलता रंगतो

 

रात्री मी प्रेमाने........तिला बिलगून बसतो

च्या मायला ! तेव्हा नेमका.......तांब्या पालथा  असतो

रविवार, १ एप्रिल, २०१२

दिवेआगार घटनेच्या अनुषंघाने गणपती बाप्पास प्रासंगिक प्रार्थना.......(याला आळवणूक म्हणता येईल का?)


रोज सकाळी चुके आमच्या हृदयाचा ठोका
तुलाच चोरून नेती कोणि प्रसंग आला बाका
दीना कैसे रक्षण जेथे तुझाच न लगे निभाव
हीन दीन तव जनतेसाठी राऊळ टाकुन धाव, बाप्पा धाव धाव धाव
राऊळ द्वारे सहज फोडिली हेमांगी तव बिंबा नेली 
सरकाराच्या नाकाखालुन गृहखात्याची वस्त्रे फिटली
विरोधकांनी तोंड उघडता निलंबनाचा डाव
हीन दीन तव जनतेसाठी राऊळ टाकुन धाव, बाप्पा धाव धाव धाव
असेंब्लीतले सूकर सगळे चिखलफेकीने मस्त रंगले
तुलाच वेठिस धरून ठेविले ताळतंत्रही सर्व सोडिले.
कमरेचेही शिरी बांधूनी करिती धावाधाव
हीन दीन तव जनतेसाठी राऊळ टाकुन धाव, बाप्पा धाव धाव धाव
लोकशाहीचे तत्वच जिरले, घरासंगती वासे फिरले
राष्ट्रभक्तीचे सत्वही विरले, राष्ट्र नव्हे भू-भागच उरले  
विश्वासाने मत ज्यां दिधले, त्यांनी घातला घाव  
हीन दीन तव जनतेसाठी राऊळ टाकुन धाव, बाप्पा धाव धाव धाव
महागाईने पिचले सारे, लक्ष्य अक्ष तव बंदच का रे ?
जगण्यासाठी टाहो त्यांचा तुजला ऐकू येतो ना रे ?
जीव ही वठले "जीवन" आटले करी बाप्पा वर्षाव
हीन दीन तव जनतेसाठी राऊळ टाकुन धाव, बाप्पा धाव धाव धाव
राबराबुनी ऊर फोडुनी हाती घेती कवड्या मोजुनी
शासन घेई आठ त्यातल्या दोनच उरल्या पहा मागुनी
नैवेद्याला एक खर्चिती मुळी नच धरती हाव
हीन दीन तव जनतेसाठी राऊळ टाकुन धाव, बाप्पा धाव धाव धाव
शिवरायांचे पाईक आम्ही, कच खाणे ते शक्यच नाही
राष्ट्रधर्म मनी जागा राही, दुर्व्यसने परी जडली काही 
कर्कासम ती वृत्ती: "खिंचो इक दुजे का पांव"
राष्ट्रतेज ते टिकवाया दे अंत:करणी ठाव, बाप्पा धाव धाव धाव
नको मंदिरे नको तसबिरी, नकोच मूर्ती नि पहारेकरी
मनात ठेवू तुझी साजिरी, प्रतिमा उत्तम सुरेख भारी
चोरीतील मग कसे चोरटे अंतरातला भाव ?
कृपा येव्हढी कर तू देवा, यासाठी रे पाव, बाप्पा धाव धाव धाव.
                                                                          
                                                                           ....अभिनव फडके




सोमवार, २६ मार्च, २०१२

बावळे लोक

कामाच्या निमित्ताने अमेरिकेला जाणे झाले. तसे आता काही अप्रूप राहिले नाही पण पहिल्यांदा गेलो होतो तेव्हा डोळे विस्फारून सगळे अनुभव घेतले. तिकडे भारतीय त्यातही मराठी माणसे भेटली की फार आनंद व्हायचा. असेच एकदा हॉप्किन्स इंटरनॅशनल एयरपोर्टला बसलेलो असताना एक जण भेटला आणी त्याचे विचार ऐकून मी हबकूनच गेलो. मनाशीच विचार केला की हे असे कसे (अर्ध्या हळकुंडाने पिवळॆ व्हायला) होते ह्यांना ?? घरी परतत होतो, उगिचच महाराष्ट्राच्या अभिमानाने उर भरून आला आणी असल्या झंप्या लोकांवर एक सादृश पोवाडा सुचला:


पाहिली फ़िरंगी भूमी ।
ऑफ़िसच्या कामी ।
अमेरिका नामी ।
नसे ती कौतुकास ही खास ॥
पुरे तो उपरा अट्टाहास ॥।
देश तो चकाचक आहे ।
संपदा राहे ।
मान्यही आहे ।
परि तया जनतेचा आधार ॥
पाळीती लोक नियमही फार ॥
स्वच्छता वसतसे ध्यानि ।
स्वच्छता कामी ।
स्वच्छता धामि ।
परि नसे फुकटाची ऐट ॥
शिस्त भिनली सर्वांगात॥
इथला झंप्या तिथे गेला ।
बावळा झाला ।
मिरवी बिरूदाला ।
स्वदेशा तुच्छ लेखतात ॥
गर्व मुरला सर्वांगात ॥
अभिमान मातृभूमीचा ।
सारूनी साचा ।
बोलती वाचा ।
घेउनि उसने ते अवसान ॥
करिति हे भलताची अनमान॥
वाटते मनाला खंत ।
शिकुनि अत्यंत ।
होती धनवंत ।
तिकडचे कौतुक गाती अपार॥
विसरिती आईचे उपकार ॥