मंगळवार, १७ एप्रिल, २०१२

वळवाचा पाऊस !


जोराचा सुटतो अनील गगनी माती उडे सर्वही ।

मेघांची गरदी जमे त्वरित ती थेंबे पडू लागती ॥

ऊष्मा होत कमी बळेच थिजती ज्वाळा जणू त्या झळा ।

मातीला सुटला सुवास कसला विश्वातची आगळा ॥१॥

 

गाराही पडती सवे धरिवरि तारांगणे भासती ।

आडावेड कसे जलस्रवण ते सर्वांग ओथंबती ॥

कामातूर प्रिया तथा प्रियकरा विरहात हो चिंतिता ।

सृष्टी मात्र झणी आरोह भरते उन्मत्त हो मन्मथा ॥२॥

 

धाडाडम धडडम धडा धडधडा सौदामिनी गर्जते ।

मेघांच्या पटलावरी क्षण क्षणी प्रक्षुब्ध तेजाळते ॥

तृष्णाक्रांत चराचरावरि जले शिंपीत तो जातसे ।

जीवांना सुखवीतसा वळिव तो वरदानची होतसे ॥३॥

……. अभिनव

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा