रविवार, २८ एप्रिल, २०१३

अल्बम


बरेचदा अनेक लहान-सहान गोष्टी आपल्याला उगीचच भूतकाळात घेऊन जातात. सर्र-सर्र काळाची पाने मागे उलटतात चालू जगाचा विसर पडतो आणि काही क्षण तो भूतकाळ आपण पुन्हा जगतो. तंद्री भंगली तरी सवडीने पुन्हा पुन्हा त्याच त्याच आठवणीत आपण जात राहतो. माणसाचा मेंदू अजब आहे. कुठल्या स्मृतिची सांगड कुठे घालेल हे माहीत नाही. भूतकाळाच्या आठवणी जागवतात आणि वर्तमानात फक्त आपले असे दोन क्षण मिळत राहतात.  जुना खूप मुरलेला काळा मोरावळा संजीवक असतो तसंच या जुन्या-पान्या स्मृति अंत:करणाला संजीवक असतात. आमटीच्या वाटीत एखादा शेवग्याच्या शेंगेचा तुकडा  यावा आणि त्या लहानग्या आनंदाने यज्ञकर्माची संतुष्टी व्हावी अगदी तसंच एखादी स्मृति ऊजळून जाते आणि आनंद होत राहतो दिवस सार्थकी लागतो. 

“मेड ऑफ द मिस्ट” अमेरिकन नायगाराची बोट सफर म्हणजे निळ्याशार स्वच्छ नदीतून धवल फेसाळत्या धबधब्याच्या मध्यात जायची संधी. बोटीवर कडेला रेलिंग धरून मी उभा होतो. थंड बाष्पामुळे मोबाइल आणि कॅमेराच्या बॅटर्‍या उतरल्या होत्या. त्यामुळे तो निसर्ग मी फक्त डोळ्यांत साठवू शकणार होतो. नाव पुढे पुढे गेली आणि धबधब्याचा उंच आवाज माणसांची कलकल आणि गाईडची बडबड यावर कडी करू लागला. पाण्याचे तुषार चेहेर्‍यावर उडू लागले. मी शरीराला त्या आवाजाच्या आणि तुषारांच्या स्वाधीन करून मेंदूचा अल्बम उघडला. 

रस्त्यावरच्या वर्दळीचे आवाज, त्या जोडीला चेहेर्‍यावर उडणारे तुषार मला खूप आवडत. सांगलीच्या राजवाडा चौकात पूर्वी एक कारंजं होतं. रस्ते फार काही रुंद नव्हते. पण फुटपाथ चांगले प्रशस्त होते. त्या फुटपाथच्या कडेला लावलेल्या पाईपाला धरून मी उभा असायचो. कारंजं सुरू व्हायचं. संध्याकाळची वार्‍याची झुळूक त्या पाण्याचे काही तुषार घेऊन यायची. हळूहळू अंधारायला लागलं की रंगी-बेरंगी दिवे सुरू व्हायचे आणि कारंज्यात रंग भरायचे. ते रंग थोड्या थोड्या वेळाने बदलत असत. मी खुपखूप वेळ तिथे उभा राहायचो. मग “अभू ! निघूया का आता ?” असा आबांचा प्रेमळ प्रश्न यायचा. आबा नेहेमी मला फिरायला घेऊन जायचे. आम्ही चालतच जायचो. राजवाड्याजवळ एक बाग होती पण तिकडे भेळ-आईस्क्रीम असली प्रलोभने असायची म्हणून आमचा फेरा कारंज्यापाशीच थांबायचा. इथे हवा तितका वेळ कारंजा फुकट मिळत होता. मला आमच्या ऐपतीची जाणीव लहान वयातच झाली होती. मी कधीही हट्ट केला नाही. आनंद मिळवायला पैसे लागतच नाहीत हे आबांना पक्कं ठावूक होतं.  

थोडासा अनिच्छेनेच मी नायगाराला आलो होतो पण इथे तुषार न्हाताना माझ्या आवडीचं कारंजं पुन्हा अनुभवायला मिळालं होतं ज्याचं मोल करता येण्यासारखं नव्हतं. माझा कलीग ब्लुबेरी स्लश घेत होता, त्याने मला हवंय का असं विचारलं. मी मानेनेच नको म्हणालो. मला त्याची काहीही गरज वाटत नव्हती. आनंद मिळवायला पैसे कुठं लागतात ?

  

आवड-नावड


कुणाला काय आवडतं किंवा आवडत नाही याला काही कारण नाही. सांगायला लाख कारणं असतात पण त्यातलं एकही खरं कारण असत नाही कारण मुळात आवडीला कारणच असत नाही. एखादी गोष्ट आपल्याला कितपत सुखावते किंवा आज्जीबात सुखावत नाही यापलिकडे आवडीची कारणमीमांसा पोचूच शकत नाही.

“साय” ही माझी सर्वात नावडती गोष्ट. का? माहीत नाही ! मला साय आवडत नाही बस्स ! मला सायीचा सुईच्या टोकायेव्हढा तुकडासुद्धा खपत नाही. मग ती साय दुधावरची, चहावरची, आमटीवरची कसलीही असो. फार काय, भाताची खरपुडी सुद्धा माझ्या लेखी एक प्रकारची सायच आहे. माझ्या अवतीभवती जवळपास सगळेच साय प्रेमी आहेत. आणि माझ्या ठायी असणारा सायीबद्दलचा तिटकारा पराकोटीला नेण्यात या सर्वांचा सदैव हातभार आहे.

ही मंडळी सायीसाठी जीव टाकतील.  स्वत:च्या चहा किंवा कॉफीच्या कपात दुधावरची अर्धी साय ओढून घेणारे हे लोक संपलेल्या दुधाच्या पातेल्यालाही चमचा किंवा सुरी घेऊन खरारा करत बसतील. चकली किंवा बाकरवडीबरोबर सायीचं दही पुढे ठेवतील आणि वर अरे घे घे असा आग्रह करतील. नुसतं एव्हढंच नाही तर ही मंडळी मला जणू गृहीतच धरतात ! जेवायला वाढलेल्या पानात शिकरणीच्या वाटीत भली मोठी साय ओततात ! बरं पानावर बसून नाक मुरडणे आमच्या तत्वात बसत नाही. मग पंचाईत होते. अहो दूध सोडाच पण जिथे सायट्याच्या भीतीने मी ताक सुद्धा गाळून पितो अशा माझ्यासारख्याला सत्वयुक्त साय वाढून वरती “खाऊन तर बघ...पुन्हा मागशील!” असली वाक्यं ऐकवण्यात यांना काय धन्यता वाटते मला कळत नाही.  लहानपणी बालवाडीत याच सायीमुळे मी शनिवारी मिळणारं दूधही प्यायचो नाही. नातवंडांचा उल्लेख करण्यासाठी “दुधावरची साय” या शिवाय दुसरी उपमा का सुचत नाही हे ही एक कोडंच आहे. कोल्हापुरात असल्यापासून लिटरभर निरसं धारोष्ण दूध पचवण्याची धमक माझ्यात आहे. साय समर्थकांनी हे आव्हान आधी स्वीकारावं आणि  मग मला साय खाऊ घालण्याची दर्पोक्ती वगैरे करावी!

“नखरे करू नको ! लोणी कसं खातोस? तूप कसं खातोस ?” हे ऐकून मी कंटाळलो आहे. जे ज्याला आवडत नाही तेच त्याला वाढून वर शाब्दिक मखलाशी करण्याचा पाठ सर्व आयांनी त्यांच्या मुलींना संसार-साराच्या रूपाने देणं बंद करावं ही माझी कळकळीची विनंती आहे.

असो. सदर उद्वेगाला “वाजणार्‍या भांड्यांचे पार्श्वसंगीत आहे हे वेगळे सांगायची गरज नसावी !

शुक्रवार, ४ जानेवारी, २०१३

बालवाडी


एका मोठ्ठ्या खोलीत सुमारे पंचवीसेक पोरांचा किलकिलाट सुरू आहे. बसायच्या सतरंज्या गोल अंथरून मुलं-मुली बसलीत. त्यांच्याबरोबर त्यांच्या “बाई” आहेत. लाकडी विटा, मणी दोर्‍या, असली खेळणी प्रत्येकाच्या समोर आहेत. कुणी हाताच्या कोपरापासून मनगटापर्यंत सुर्र सुर्र आवाज काढून नाकातून पडायच्या बेतात असलेला हिरव्यागार शेंबडाचा लोलक पुसलाय. एक बाई त्याला सटके ओढून स्वत:च्या रुमालाने त्याचं नाक पुसताहेत. दुसर्‍या एक बाई थोड्या थोड्या मुलांना परसाकडे नेऊन आणताहेत.  कुणाचं सकाळी आलेलं रडू गालावर मळलेल्या रेघांवरून कळतंय. फळ्यावर हजेरी मांडलीये, कमळ किंवा गुलाब असल्या फुलाचं चित्र काढलंय. आतल्या लहान खोलीतून तावलेल्या स्टोव्हचा “स्स sssss……स्स......” आवाज येतोय. आणि एकदम, एक बाई “चला, हात जोडून बसा, रडू नका, आता खाऊ देणार आहे, मग आपापल्या घरी पळायचं आहे ! प्रार्थना म्हणा…. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ....” प्रार्थना सुरू झाली की नऊवारी साडीतल्या एक बाई हातात खाऊच्या वाट्या घेऊन येतात.

हे चित्र; मी जिथे जगातली सर्वोच्च सुखं उपभोगली त्या शिशुविहार नावाच्या बालवाडीचं आहे. मात्र त्या वयात सुख आणि दुख: असल्या व्याख्यांचा संबंध नव्हता. आमची बालवाडी एका ट्रस्टची होती. तिथे रोज खाऊ मिळायचा. सगळ्यांच्या लाडक्या नऊवारी साडीतल्या तोंडाचं बोळकं झालेल्या आनंदीबाई रोज खाऊ करायच्या. पावाची भाजी, पोहे, उपमा, चिवडा, केळी...... रोज निरनिराळा खाऊ. फक्त शनिवारचा खाऊ मला आवडायचा नाही कारण त्या दिवशी दूध असायचं आणि त्यावर साय धरायची ( साय इ..इ..इ....!).

सकाळी 9 ते दुपारी 12 बालवाडी होती. बाईंच्या शेजारी बसणे मानाचे असायचे. आमच्या सुधाताई नावाच्या बाई बसने यायच्या. बसचे तिकीट घडी करून त्यांच्या घड्याळाच्या पट्ट्यात खोवलेले असायचे. कुणी चांगले गाणे, अंक, बाराखडी वगैरे म्हटले तर ते बसचे तिकीट बक्षीस द्यायच्या. सगळ्यांना त्या तिकिटाचं अप्रूप होतं. कधी गोष्टी सुरू व्हायच्या, कधी बाराखडी, कधी अंकलिपी. “डोक्यावर चांदोबा आणि गंगा | जटाधारी देवाचे नाव सांगा ||” असं हातावर टाळ्या देत गाणं किंवा “ऊभा एक, आडवे दोन,....एकावर पूज्य दहा !” असे अंक जपायचे  किंवा “क- कणसाचा” असली अक्षर ओळख करत करत अभ्यास चालायचा. याला अभ्यास म्हणतात हे मला फार नंतर कळलं. मात्र “ण” बाणातला कसा ?आणि आमच्याकडची संध्येची पळी “नवा”सारखी दिसत नाही हे मला बाईंना सांगायचं होतं......राहिलं !

पाणी प्यायच्या सुट्टीत (या सुट्टीला बायो-ब्रेकच्या मराठी नावाने हाकारलं तर पाप लागायचं बहुतेक!) कुणी कुणी खिशातून आणलेला खजिना काढायचे. मग जवळच्या मित्रालाच फक्त वाटा दिला जायचा. आमच्या घरी मूठभर शेंगदाण्याचीही वानवा असायची. आज्जी मला खडे-मिठाचे दोन मोठे खडे द्यायची. एक मला आणि एक प्रसादसाठी. ते खडे हळू हळू तोडून खाताना प्रसाद हजरनिस आणि मी हरखून जायचो. प्रसादाचे घर शेतात होते. तो कधी कधी शेवरीच्या करंजीतून म्हातारीचा कापूस आणायचा. प्रसाद खरोखरी खाल्ल्या मिठाला (खडे-मिठाला) जागायचा आणि मला सर्वात पहिल्यांदा वाटा द्यायचा. जाई देशपांडे चिंचोके आणायची मला द्यायची. पण चिंचोके फक्त मुलीच खेळतात असं प्रसाद मला म्हणाला होता म्हणून मी घ्यायचो नाही. जरी मी चिंचोके घेत नसलो तरी जाई आणि तिची बहीण जुई आमच्या घरी बुचाची फुलं घ्यायला यायच्या. संतोष ठोंबरे दांडगोबा होता. सगळ्यांना मारायचा. पण मी पायरीवरून पडलो तेव्हा तोच मला उचलून वर्गात घेऊन गेला होता. डोक्याला खोक पडते म्हणजे काय होतं हे मला त्यानं समजावलं होतं.

आम्ही आपोआप लहान गटातून मोठ्या गटात गेलो. सगळ्या बाई सुद्धा लहान गटातून मोठ्या गटात आल्या. मी अथर्वशीर्ष स्पर्धेत पहिला आलो तेव्हा गाडगीळ बाईंनी मला एक अख्खा खडू बक्षीस दिला. अमेय वाकणकरने तो तोडला. मग आमच्यात मारामारी आणि रडारडी झाली. मग बाईंनी दोघांनाही एकेक अख्खा खडू दिला. माझ्या वाढदिवसाला गोळ्या वाटल्या होत्या. त्या गोळ्या मी नेल्या नव्हत्या. आमची परिस्थितीच नव्हती असले सोस करायची. दिवाण बाईंनी माझ्याकरिता गोळ्या वाटल्या होत्या. त्यानंतर आबा स्वत: शाळेत येऊन दिवाण बाईंना पैसे देऊन गेले.

काही दिवसांनी मी पहिलीत गेलो, आणि पुढे दरवर्षी इयत्ता बदलली. संतोष ठोंबरेप्रमाणे मी सारखा सारखा त्याच वर्गात का राहू शकलो नाही ते कळले नाही. त्या लहान–मोठ्या गटातली फार मोठी सुखं कॅलेंडरच्या पानांसोबत निसटून गेली ती पुन्हा कुठेही गवसली नाहीत. त्या बसच्या तिकीटाच्या चिटोर्‍याचं मोल कुणाला काय सांगणार आणि कुणाला कसं कळणार! बोनसचा चेकही आज तितका आनंद देत नाही. खडे-मीठ गेल्या दहा वर्षांत बघितलं नाहीये. प्रसाद हजरनिस कापसाच्या म्हातारीसारखाच दूर उडून गेलाय तो फेसबुकच्या जाळ्यातही अडकलेला मिळाला नाही. गाडीवरून पडून माझा गुडघा फुटला तेव्हा माझा मेंदू गुडघ्यात आलाय हे जाणवलं; पण संतोष ठोंबरे उचलायला आला नाही. अमेय वाकणकर आणि मी मात्र खडूसारखेच झिजतोय.............आख्खा खडू मिळवण्यासाठी !

रविवार, ९ डिसेंबर, २०१२

चवीने खाणार त्याला...........


मी शाकाहारी. देशावरचे (कोकणातले नाही!) मांसाहारी जन आम्हाला (शाकाहारी लोकांना) गवत खाणारेच समजतात. पण मला त्याचं वैषम्य वाटत नाही (कोल्हयाला द्राक्षं आंबट !) त्याचं असं आहे, मी खाद्य-भक्त आहे. त्यामुळं मी पंथ मानत नाही. शाकाहारी असलो तरी मांसाहाराला तुच्छ लेखत नाही कारण चवीने खाणं हे एक कमावण्याचं कसब आहे. एखादा पदार्थ साधा आहे किंवा स्पेशल या पेक्षा गुणवत्तेच्या निकषांवर माझ्यासारखे खवय्ये त्याचं मूल्यमापन करतात.
वानगीदाखल, नुसता वरणभात घ्या – तांदूळ कुठला, कसा शिजवला, वरणात मीठ, हळद, किती हिंग लावलेय की नाही, या सगळ्यावर त्याची चव अवलंबून आहे. पहिला घास खाल्ल्या-खाल्ल्या हे सगळं समजायला हवं. यालाच कसब म्हणतात. (अधिक माहितीसाठी: असला बेंच-मार्क वरणभात मिरजेला दत्त मंगल कार्यालयात मिळतो.) चोखंदळपणे आणि अचूक खाद्य समीक्षा करण्यासाठी चवीनं खाणं आवश्यक आहे. किती खाल्लं हे महत्वाचं नाही. आदरणीय “पुलं”नी लिहिलाय “शंभर लाडू खाणार्‍याला खवैय्या म्हणणं हे शंभर गाणी म्हणणार्‍याला गवैय्या म्हणण्याइतकं चुकीचं आहे”
लहानपणापासून आज्जीच्या हातचं खाल्लं असल्यामुळे उत्तम चव अस्मादिकांच्या जिभेवर पक्की बसलेली आहे. पुरणपोळी खाताक्षणी त्यातला गूळ कसला आहे किंवा साखर मिसळली आहे किंवा नाही हे मी ओळखू शकतो, कधीमधी घरी “कणीक जरा कमी वेळ तिंबली जावी” किंवा “मोदकाची उकड जरा तेल जास्त लावून अर्ध्या वाफेवर काढा” असले सल्ले / कमेन्ट केल्याने घरच्यांचा रोष ओढवून घेतलाय. वरण वाढून घेताना “कुकरला एक शिट्टी कमी दिली का?” हा प्रश्न विचारल्यावर सहचारिणीच्या चेहेर्‍यावर आश्चर्य मिश्रित राग पाहिला आणि “तुझे फार लाड केलेत तुझ्या आज्जीनं ! म्हणून असले चोचले आहेत तुझे !” हा शेरा मिळाला. मला पदार्थ अधिकाधिक उत्तम कसा होतो हे माहीत आहे पण स्वयंपाक जमत नाही. (तसं असतं तर द्वारकानाथ सांझगिरी यांनी गावस्करांचे रेकॉर्डही मोडले असते नाही का?) 
साखरेचं खाणार त्याला देव देणार” या म्हणीचा लौकिक किंवा गर्भितार्थ जरी काहीही असला तरी मला त्याचा शब्दश: अर्थच भावतो कारण मी गोडघाश्या आहे. रोजचं जेवण गोडाशिवाय पूर्णच होत नाही. पक्वान्न असेल तर उत्तमच, पण नसेल तर अगदी गूळ-तूप, तूप-साखर, दूध-साखर, शिकरण असलं काहीही चालतं. ताटातला पदार्थ साधाच असला तरी तो किती उत्कृष्ट दर्जाचा आहे यावर जेवणाचं समाधान ठरतं. मग मुगाच्या डाळीची खिचडी गरमगरम खिचडी, कढी आणि परातभर मिरगुंडं (मिरगुंड खाताना ठसका लागला नाही तर ती पडीक बियरसारखी “फ्लॅट” झालीत आहेत हे समजावे) हा बेत असुदे किंवा पुरणाचे कडबू, कटाची आमटी आणि भात असला खास श्रावणमासी बेत असुदे; तृप्तता सारखीच.
जिन्नसाची खरी चव जाणायला जिभेबरोबरच नाकही तेज आणि तरबेज असणं गरजेचं आहे. वासाची जाणीव नसताना, भातावर घातलेले तूप वा पामतेल सारखेच, गोळ्याच्या सांबारावरची वाफ आणि अंघोळीच्या पाण्यावरची वाफ सारखीच. उगाळलेले जायफळ आणि गोपीचंदन सारखेच. म्हणून सर्दी झाल्यावर फक्त साबूदाण्याची खीर खावी हे बरे.
काही पदार्थांच्या चवीला प्रसंगाची पार्श्वभूमी असावीच लागते. म्हणजे वडापाव नाटक किंवा सिनेमाच्या मध्यंतरात जास्तच झकास लागतो. सांगलीत असताना फक्त श्राद्धाला खाल्लेली अळूची पातळ भाजी पुण्यात लग्नाच्या पंगतीत तितकीशी पसंत पडली नाही. उशिरापर्यंत चालणार्‍या सीमंतपूजनाला रात्री सुधारसही पक्वान्न वाटतो. दसर्‍याला श्रीखंड, किंवा बासुंदी शिवाय मजा नाही. गौरीच्या जेवणाला पुरणपोळीच हवी (पण कटाची आमटी दुसर्‍या दिवशी शिळ्या भाताबरोबा जास्त चविष्ट लागते). गुलाबजाम हा थोडा आपुलकी नसलेला वाटतो म्हणून कुठल्याही प्रसंगी खपवता येतो. रस-युक्त असूनही बर्‍यापैकी नीरस असं हे पक्वान्न आहे. पण वॅनीला आईस्क्रीमसोबत गरम गुलाबजाम म्हणजे खासा बेत !   
मुख्य जेवणाबरोबरच डाव्या-उजव्या बाजूचे पदार्थही महत्वाचे. त्यातल्या त्यात ताक हा पदार्थ मन ओतून घुसळला तरच रुचकर अन्यथा फक्त द्रव. (“भगत ताराचंद” नावच्या हॉटेलात बियरच्या बाटलीत ताक मिळते, ते जेवणाआधी प्याल तर जेवणच होणार नाही, भांगे सारखीच चटक लागेल आणि नुसते ताकच मागवत बसाल!) कोशिंबीर “पूना गेस्ट हाऊस” पेरु-गेट यांच्यासारख्या चवीची मी इतर कुठेही खाल्ली नाही. माइनमुळ्याचं लोणचं मला कुणी वाढलं तर मी दोनदा “अन्नदाता सुखी भव |” म्हणतो.
आज्जी असताना वार्षिक चार राजेशाही उपास असत (आषाढी-कार्तिकी या दोन एकादश्या, महाशिवरात्र, अंगारकी-चतुर्थी). या दिवशी आमचेकडे साबूदाण्याची खिचडी, वर्‍याचे तांदूळ, बटाट्याचा शिरा, रताळ्याचे गुळातले काप, तळणीचे पदार्थ, उकडलेल्या शेंगदाण्याची उसळ, आणि सर्वोत्तम दाण्याची आमटी असा साग्रसंगीत स्वयंपाक असायचा. सध्या हे ही उपास फक्त खिचडी, शिंगाड्याचे थालीपीठ असे एकजिनसी भागवले जातात. असो.
शेवटी जाता जाता  काही टिप्स.........साधेच पदार्थ चढया दर्जाचे करण्यासाठी किंवा भासवण्यासाठी J
गरम गरम पोळ्या वाढायच्या असतील तर लाटताना थोडा ओवा पेरा. पिठले करताना डाळीच्या पिठाबरोबरच एक चमचा ज्वारीचं पीठ घाला. शिळ्या पोळ्या / शिळी आमटी यापासून चकुल्या करताना आल्याचा तुकडा ठेचून टाका आणि मग उकळी आणा. आळलेले तूप डायरेक्ट गॅसवर गरम करू नका त्या ऐवजी एका पातेल्यात पाणी गरम करून त्याने तूप वितळू द्या.  मूग-डाळ खिचडी पातेल्यात अर्धवट शिजवा आणि मग कुकरमध्ये शिट्टी काढा. एक वाटी श्रीखंडावर दोन चमचे साजूक तूप घालून खा (सांगली-स्पेशल). पोळीचा लाडू करताना कढईत तूप तापल्यावर त्यात गूळ टाका आणि तो वितळल्यावर मग पोळीचा चुरा घाला.  मिरचीचा ठेचा (केळकर स्टाइल) शेंगतेलापेक्षा खोबरेल तेल घालू खा. अंबाडीची गोळा भाजी चुकली तर त्यात मूठभर भडंग (सांगली-स्पेशल) मिसळा आणि अदृश्य होईतो घोटा आणि मग भाजी वाढा; चुकलेल्या भाजीचंही कौतुक होईल !

बुधवार, २८ नोव्हेंबर, २०१२

मंडई ........डोक्याची !

आम्ही दोघे मंडईत जातो (आता मंडईत जाणारे "दोघे" हे बहुधा नवरा-बायकोच असतात ...आम्हीही तेच "दोघे" असतो. अर्थात आम्ही कनिष्ठ मध्यमवर्गीय, त्यामुळे अजूनही मंडईतून किंवा यार्डातून भाजी आणणे हा प्रघात सुरू आहे. क्वचित अगदी गरज म्हणून दारावर येणारी, जवळच्या किराणा दुकानात मिळणारी, किंवा फोन करून घरपोच मिळणारी भाजी घेतली तरी मनात रुख रुख लागते असो. "फडके" आडनाव म्हणजे हे असंच असायचं.)
माझी एक सवय आहे. मी नेहेमी अख्खी मंडई आधी फिरून बघून घेतो आणि मग भाजी घ्यायला सुरुवात करतो म्हणजे कुठे काय काय माल आहे, साधारण दर काय आहे वगैरे वगैरे कळतं. इथे आमच्यात पहिला मतभेद होतो. तिच्या म्हणण्याप्रमाणे पटकन जे चांगलं दिसेल ते घेऊन मोकळं व्हायचं, काम कमी होतं ना ? छ्या! बाजार करणं हे काय उरकून टाकायचं काम आहे? हाताला हात लाऊन मम म्हणण्यासारखं? चांगले दोनेक तास काढून भाजीला जावं आख्खी मंडई पालथी घालावी आणि मस्तपैकी भाजी अगदी जोखून घेऊन परत यावं. उरकायचा बाजार यार्डात करायचा ! मंडईत फिरताना प्रदर्शन बघितल्याप्रमाणे फिरावं, त्यात मजा आहे. पण इकडे पटेल तर शपथ. उलट त्या डिपार्टमेंटल स्टोअर मध्ये ही पूर्ण दिवस घालवेल आणि निम्मी खरेदी बिनाकामाच्या वस्तूंची करेल. वर तसं म्हणावं तर "लागतात ! तुला कळत नाही" ही एकच मात्रा चालवेल. हिला कळणार्‍या गोष्टी मला का कळत नाहीत हे मला अजूनही कळलं नाहीये.
आधी कांदे बटाटे घ्यावेत, मग फळभाज्या, सर्वात शेवटी पालेभाज्या, टोमॅटो आणि केळी - हा मला मिळालेला पाठ. इथे दूसरा मतभेद! "आधी कांदे बटाटे घेऊन कशाला ओझं वागवत फिरायचं? शेवटी वेगळ्या पिशवीत घेऊ." (खरं तर सगळं ओझं मीच वागवतो) पण इथे थोडा दोष माझा आहे. भाजी घेतल्यावर माझ्या हातात असणार्‍या एकूण पिशव्या आणि घरी आल्यावर केलेली मोजदाद कधीच जुळत नाही (काय वेंधळा आहेस !, विसरलास वाटतं !, काय करावं ह्या माणसाला ! गाडीत ठेवली होतीस का पिशवी ? काही आठवतंय का? धन्य रे बाबा ! ............... इ. इ. आवाजी फटाके) म्हणून मी नेहेमी दोनच मोठ्या पिशव्या घेण्याबाबत आग्रही असतो, तिसरी पिशवी वाढवायची म्हणजे माझ्या पोटात गोळा!
कांदे बटाटे, आलं, लसूण, मिरच्या, कोथिंबीर, कढीलिंब हे प्लॅटफॉर्म जिन्नस सोडता तिसरा मतभेद भाज्यांच्या निवडीच्या बाबतीत असतो इथे मात्र दोघांच्याही मुत्सद्दीपणाचा कस लागतो. पूर्वी जसा म्हशींसाठीचा "मिलो" रोजगार हमीचे दुष्काळी खाद्य म्हणून आपल्याकडे आला तसंच कोबी, नवलकोल ह्या भाज्या जनावरांच्यासाठी निर्माण झाल्यात असं माझं ठाम मत आहे. हिला कोबी, नवलकोल, पडवळ, दुधी भोपळा, सुरण असल्या नीरस ताटभरू गर्दीच्या भाज्या घेण्यात पराकोटीची धन्यता वाटते. पाहुणे येणार नसले तरीही ही असल्या भाज्या घेते. मी मात्र वांगी, भेंडी, कारले, फुलकोबी, ढब्बुमिरची, असल्या रसना तृप्त करणार्‍या भाज्यांच्या बाजूने असतो. मेथी मला आवडत नाही (माझा दोष), अंबाडी हिला करता येत नाही (माझाच दोष.........कसा?......आपण सूज्ञ आहात!), उरता उरले पालक, पोकळा आणि लाल माठ; जे घेऊन घेऊन किती घेणार? शेवटी ज्याचा दिवस असतो त्याचा विजय होतो आणि त्याप्रमाणे भाजी आणली जाते.
बहुतेक सर्वच संसारी घरांत असले चित्र असेल. नाहीतर मटकी, चवळी, मसूर, यासारखी तद्दन मंगल कार्यालय छाप किंवा मेस छाप(घरगुती खानावळ) कडधान्ये दरमहा किमान पावकिलो रतीबाने घराघरांत आलीच नसती

रविवार, १८ नोव्हेंबर, २०१२

Joy of Giving

"उद्या सकाळी ऑफिसला जाता जाता भेटून जा" बायको मला सांगत होती. मी जेवता जेवता मान डोलावली. नात्यातले एक गृहस्थ अॅडमिट होते त्यांना भेटायला जायचं होतं. दुसरे दिवशी सकाळी निघालो. निम्म्या रस्त्यात बायकोचा फोन ...."आज डब्यात तुपासाखर पोळी गुंडाळून दिलीये......आणि तू पाकीट घरी विसरून गेलायस". काहीतरि जुजबी उत्तर देऊन मी फोन ठेवला. मग ध्यानात आलं च्यायला पाकीट विसरलो म्हणजे पैसे, कार्ड , लायसेन्स सगळं घरीच. आता रिकाम्या हातानेच भेटायला जावं लागेल. तसंही बाकीच्यानी भलते फळं, बिस्किटं आणलं असेलच की; असला सोयिस्कर स्वार्थी विचार करून मी दवाखान्यात गेलो. सदर गृहस्थ ग्लानीत होते. सलाईन लावलं होतं. तसं दवाखान्यात वर्दळ अगदी कमी होती. पेशंटही कमीच होते. यांच्याजवळ कुणीच नव्हतं म्हणून शिफ्ट च्या सिस्टरकडे चौकशी केली तर त्या म्हणल्या की आत्ताच घरी गेलेत. अर्धा तासात आवरून येतील. (चला म्हणजे मी हात हलवत आलोय हे कळणार नाहीच....पुन्हा सोयीस्कर स्वार्थी विचार). मी त्यांच्या तब्येतीविषयी विचारले. "यांना अन्न जात नाहीये. तीन दिवस काहीही खाल्लेले नाही" (मग मी फळं, बिस्किटे आणून काय उपयोग ? .......... पुन्हा तोच सोयिस्कर स्वार्थी विचार). थोडा वेळ वाट बघितली पण पेशंटकडे कोणी आले नाही. मी सिस्टरकडे निरोप ठेवून बाहेर येऊ लागलो.
"ए प्वोरा !" जनरल वार्डाजवळ एक टोपीवाला गावकरी तात्या बसून होता. त्याने मला हाक मारली. "माजा ल्योक गावास्न येव रायलाय, मला आडमिट करनार हायेत पन त्येनला येळ लागंल. काय बाय खायला पायजेल. तवा एक धा रुपे दिशील काय ? मी माळकरी हाय. यष्टीला पैसं सपलं बग" तो म्हणाला..................झाली पंचाईत! मी ऑफिसच्या ड्रेसकोडमध्ये टकाटक, आणि खिशात दमडा नाही. वेळ सुद्धा वेळ साधून येते ! पैसे नाही म्हणावे तर त्याच्याच समोर मी गाडी काढून निघणार होतो. मला काही सुचेना, त्याला हाताने पाच मिनिटे थांब अशी खूण करून मोबाइल कानाशी लाऊन मी उगीचच इकडे तिकडे बघू लागलो. शेवटी धीर केला आणि त्याला सगळी परिस्थिति सांगितली. आणि म्हणालो "बाबा, माझ्याकडे खरंच पैसे नाहीयेत. पण माझा डबा आहे तो तुम्हाला चालेल का ?" तो हसून हो म्हणाला. मी माझा डबा त्याला दिला त्याने अधाशीपणे तो संपवला. आणि रिकामा मला परत दिला (टप्परवेयर चा डबा , परत नेलाच पाहिजे अन्यथा घरी शिव्यांची ओवाळणी झाली असती).
मी ऑफिसला आलो, कंपनीच्या वेबसाइटवर CSR चा "Joy of Giving" एव्हेंट दिसत होता......................दीड वाजता सगळे जेवायला गेले. मी कामच करत राहिलो............"joy of Giving" ने माझं पोट सकाळीच तुडुंब भरलं होतं.

बुधवार, २४ ऑक्टोबर, २०१२

सीमोल्लंघन


“नवरात्र संपले दसरा उजाडला; मोरुचा बाप मोरूला म्हणाला – मोरू, उठ लवकर”...................या दर दसर्‍याला आठवणार्‍या वाक्याने आजचा दसराही उजाडला आहे. लवकर उठून सगळी अन्हिके आटोपली आहेत. देवाची पूजाही झालीये. सुट्टी असल्याने कार्तिकी एकादशीचा देवाच्या मूर्ति घासण्याचा उद्योग आजच केला आहे. चकचकीत देवबाप्पा खरोखरच फ्रेश दिसतोय. घरीदारी, गाड्यांना तोरणे लावलीयेत हार घातलेत. खास सांगलीहून बासुंदी मागवलीये. जेवणाचा बेत हळू हळू आकार घेतोय.

पण आज मी काही तरी नवीन केलेय. खरंतर नवीन काहीच नाहीये मात्र एक जुनं टाकायचा निर्णय घेतलाय आणि तो अंमलात आणलाय............ आपटा-शमी तोडणार नाही, तोडलेले विकत घेणार नाही आणि वाटणारही नाही ! एक तिथी उलटल्यावर ज्या सोन्याचा कचरा होतो असलं आशाश्वत वाण फक्त परंपरेच्या नावाखाली वाटत फिरायचं ? वारांगनेचीही इतकी उपेक्षा होत नसेल ! मला तर हे पटत नाहीये म्हणूनच मी ही परंपरा मोडण्याचा (खरे तर सुधारण्याचा) प्रयत्न करणार आहे. सोन्यासारख्या या वृक्षश्रेष्ठांचं परंपरेनं सांगितलेलं महत्व मी जाणलंय, ओळखलंय. मी परंपरेचा प्रचंड आदर करतो आणि म्हणूनच परंपरेचा विपर्यास मला बघवत नाही. शाळेची कळू लागल्यास मोजलेली सहा वर्षं “...........या देशाच्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन...............” रोज मी ही दोन वाक्यं प्रतिज्ञेत म्हटली. आज मला अभिमान आहे मी त्या परंपरांचा पाइक होण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे.

अंधानुकरण करणे आणि परंपरा पाळणे यात मोठा फरक आहे. पण त्या फरकाची रेषा सूक्ष्म आहे. मला या थोर परंपरेला बांधील राहायचं आहे. माझ्या ओळखीच्या एका माळीबाबांना मी आपट्याचं बोन्साय मागितलं आहे (जागे अभावी मोठं झाड लावणं अशक्य आहे.). डिसेंबरअखेर ते माझ्याकडे येईल. मी ते जोपासेन. पुढच्या आणि त्यानंतरच्या प्रत्येक दसर्‍याला त्याचं मनोभावे पूजन करीन. शक्य झाल्यास पानांऐवजी झाडेच वाटेन. प्रथा-परंपरेचा वैश्विक कल्याणकारी अर्थ जाणून न घेता फक्त त्यांच्या भौतिक बंधनांत अडकलेली माझीच माणसं माझ्यावर टीका करतील. पण मी त्याही बंधनांच्या सीमा उल्लंघिलेल्या आहेत.